Sawan 2021: रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 09:04 AM2021-08-17T09:04:55+5:302021-08-17T09:09:10+5:30

rudraksha: श्रावण हा शिवाचा महिना मानला गेल्यामुळे श्रावणात कोणत्याही उद्देशासाठी आणि कोणत्याही दिवशी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे.

शिवमहिमा अगाध आहे, असे मानले जाते. त्रिमुर्तींमध्ये तसेच पंचदेवतांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान शिवाला आहे. शिवाशिवाय पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे. कारण महादेव शिवशंकर लयतत्त्वाचे स्वामी आहेत, असे मानले जाते. महादेवाचे विविध स्वरुपात पूजन केले जाते. तसेच शिवाची निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. (types of rudraksha)

या विविध गोष्टींपैकी एक म्हणजे रुद्राक्ष. शिवपुराणानुसार, शिवाच्या डोळ्यातील अश्रुंचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली, असे सांगितले जाते. महादेवाचे हे एक प्रमुख प्रतीक मानले गेले आहे. शिवनाथाचे शुभाशिर्वाद प्राप्त व्हावेत, यासाठी रुद्राक्ष धारण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात. वेगवेगळ्या कारणांसाठी, मनोरथ सिद्धीसाठी रुद्राक्ष धारण केले जाते.

श्रावण महिन्यात केलेल्या शिवपूजनाला विशेष महत्त्व असते, अशी मान्यता आहे. त्यामुळे शिवाच्या प्रतीकांनाही अधिक महत्त्व प्राप्त होते. वास्तविक पाहता रुद्राक्ष केवळ सोमवारी आणि प्रदोष दिनी धारण करावे, असे सांगितले जाते. मात्र, श्रावण हा शिवाचा महिना मानला गेल्यामुळे श्रावणात कोणत्याही उद्देशासाठी आणि कोणत्याही दिवशी धारण करणे शुभ मानले गेले आहे. रुद्राक्षाचे धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे, तितकेच ते आरोग्यदृष्ट्याही असल्याचे सांगितले जाते.

शिवपुराणातील मान्यतेनुसार, एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे हृदयरोग आणि नेत्ररोगाच्या समस्या बहुतांश प्रमाणात कमी होतात. याशिवाय डोकेदुखीचे आजार कमी होतात. मानसिक विकार दूर होण्यास मदत मिळते. मन भयमुक्त आणि शांत होते. इतकेच नव्हे, तर एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे लक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद मिळतात, अशी मान्यता असल्याचा दावा केला जातो.

दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास संसर्गजन्य रोग, डोळ्यांचे आजार कमी होतात. तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास रक्ताचे आजार, उच्च रक्तदाब तसेच अल्सरसारख्या समस्यांचे प्रमाण कमी होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शिवपुराणानुसार, शास्त्रज्ञ, संशोधक आणि चिकित्सक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ असते. चारमुखी रुद्राक्ष मान, सन्मान, प्रसिद्धी, कीर्ती, प्रतिष्ठाकारक मानले गेले आहे.

मानसिक आजार, ताप, पक्षाघात तसेच नाकाशी संबंधित आजारांचे प्रमाण यामुळे कमी होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, नाक आणि कानाशी संबंधित आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. सहामुखी रुद्राक्ष शिवपुत्र कार्तिकेयचे प्रतिनिधीत्व करते. सहामुखी रुद्राक्ष धारण केल्यास उत्तम विचार वाढीस लागतात. सकारात्मकता येते. समाजातील मान, सन्मान वाढतो, असे सांगितले जाते. (benefits of wearing rudraksha)

रुद्राक्षाबाबत शिवपुराणात काही मान्यता आहेत. शिवपुराणानुसार, सप्तमुखी रुद्राक्ष धारण केल्यास हाडांचे तसेच डोकेदुखी आणि मेंदू संदर्भातील काही आजार कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. सहामुखी रुद्राक्ष शिवपुत्र कार्तिकेयचे प्रतिनिधीत्व करते, त्याचप्रमाणे अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे गणेशाचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत राहाल; तेथे यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.

त्वचा व डोळ्याशी निगडीत आजारांसाठी अष्टमुखी रुद्राक्ष उत्तम असते, असे सांगितले जाते. नऊमुखी रुद्राक्ष धारण केल्यास आर्थिक पातळी चांगली राहते. मिळकतीत वाढ होण्याचे योग बळावतात. उत्पन्नाची नवी द्वारे खुली होतात. तर दहामुखी रुद्राक्ष धारण केल्यास व्यक्तीची विचार सकरात्मक आणि उच्च होतात. उदर आणि नेत्र रोगावर याचा सकारात्मक प्रभाव जाणवतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

शिवपुराणानुसार, अकरामुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. असे रुद्राक्ष धारण केल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक आवड वाढीस लागते. तीर्थाटनाचे योग वाढतात, असे सांगितले जाते. तर बारामुखी रुद्राक्ष धारण केल्यास नेत्रविकार दूर होण्यास मदत होते. तेरामुखी रुद्राक्ष धारण केल्यास दाताच्या समस्या कमी होतात. चौदामुखी रुद्राक्ष धारण केल्यास शनीचा प्रभाव कमी होतो.

तसेच केसासंदर्भातील आजार कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. रुद्राक्षाचा प्रकार कोणताही असला, तरी ते धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते अभिमंत्रित करणे आवश्यक असते. रुद्राक्ष अभिमंत्रित करून विधीवत धारण केले नाही, तर त्याचा लाभ मिळत नाही, असे सांगितले जाते.

रुद्राक्ष अभिमंत्रित केल्याने मानवी शरीरातील प्राण तत्त्व आणि विद्युत शक्ती नियंत्रित होते. अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष अत्यंत गुणशाली असते, असे सांगितले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी सात दिवस ते मोहरीच्या तेलात भिजवावे. यानंतर लाल धागा, चांदीची माळ या माध्यमातून ते धारण करावे. रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगाजलमिश्रित पंचामृत, पंचगव्य यांनी रुद्राक्षाला अभिषेक करावा.

ते स्वच्छ करून घ्यावे. यानंतर ॐ नमः शिवाय आणि ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात् या दोन्ही मंत्रांचा १०८ वेळा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. ज्या रुद्राक्ष माळेचा जपासाठी वापर केला जातो, ती माळ धारण करू नये. तसेच धारण केलेल्या माळेचा जपासाठी, नामस्मरणासाठी वापर करू नये, असे सांगितले जाते.