Sarvapitri Amavasya 2021: सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध विधी करावे? पाहा, मान्यता, मुहूर्त, शुभ योग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:30 PM2021-10-05T18:30:52+5:302021-10-05T18:38:00+5:30

Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2021: सर्वपित्री अमावास्येला श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध कार्य पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते.

भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. यंदाच्या वर्षी ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. भाद्रपद वद्य पक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेष करून राखून ठेवला आहे. अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे दाखले आढळून येतात. (Sarvapitri Amavasya 2021)

सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान, तर्पण विधी करतात. पूर्वजांच्या कृपाशिर्वादामुळे वारसांना सुख, शांती, समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे मानले जाते. (sarva pitru amavasya 2021)

या पितृपक्ष पंधरवड्यात पृथ्वीतलावर आलेले पूर्वज वारसांकडून अन्न, जल ग्रहण करून सर्वपित्री अमावास्येला पुन्हा एकदा पितृलोकात जातात, अशी मान्यता आहे. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्ध कार्य करताना शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, रुढी आणि काही नियमांचे पालन करावे लागते, असे सांगितले जाते.

सर्वपित्री अमावास्येला श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध कार्य पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. पितृपक्ष पंधरवड्यातील अखेरचा दिवस म्हणून सर्वपित्री अमावास्येकडे पाहिले जाते. सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

यंदाच्या वर्षीची सर्वपित्री अमावास्या ०५ ऑक्टोबर रोजी रात्रौ ७ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होणार असून, ०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४ वाजून ३५ मिनिटांनी समाप्त होईल. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे ०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सर्वपित्री अमावास्येचे विधी करावेत, असे सांगितले जात आहे.

श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते. पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो.

त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही वा करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते.

त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सात्विक भोजन घ्यावे. दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजचे तिन्ही सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा.

यानंतर देवासमोर एक दिवा लावावा. एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी. पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर, वारसांवर कृपादृष्टी व शुभाशिर्वाद कायम राहावेत, अशी इच्छा प्रकट करावी. अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमायाचना करावी. तसेच तृप्त मनाने पितृलोकात परतरण्याची विनंती पूर्वजांना करावी, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येला घरातील महिला वर्गाने सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी.

पूर्वज्यांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पण विधी करून झाले की, पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी असे म्हटले जाते. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरुपात येऊ शकतात, अशी मान्यता आहे. घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते. केवळ हिंदू धर्मशास्त्रातच नाही, तर पारशी, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन अशाही धर्मांमध्ये पितरांना अन्न, पाणी देण्याची प्रथा आहे.

श्राद्ध तर्पण विधी करताना ते श्रद्धापूर्वक करावे. सर्वपित्री अमावास्येला कोणाचाही अपमान करू नये. घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये. प्रत्येक जीवाचा आदर करावा. कोणत्याही पशु-पक्ष्यांचा अपमान करू नये, त्यांना त्रस्त करू नये. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. शक्य झाल्यास पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते.

यंदाच्या वर्षी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी दुर्मिळ मानला जाणारा गजच्छायायोग जुळून येत आहे. हा योग केवळ पितृपक्षात जुळून येतो. या योगाच्या कालावधीत पिंडदान, तर्पण, श्राद्ध विधी करणे उत्तम मानले जाते. यामुळे पितर तृप्त आणि प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हा योग प्रत्येक वर्षी येतोच असे नाही. सूर्य आणि चंद्र दोन्ही ज्यावेळेस हस्त नक्षत्रात असतात, तेव्हाच हा योग जुळून येतो.

सूर्यावर राहु किंवा केतुची दृष्टी पडल्यावर हा योग येतो. पितृपक्षातील भाद्रपद वद्य त्रयोदशी किंवा अमावास्या या दरम्यान हा योग येतो. यावर्षी हा योग सर्वपित्री अमावास्येला येत आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये सर्वपित्री अमावास्येला अशा प्रकारचा योग जुळून आला होता. या योगाबाबत स्कंदपुराण, अग्निपुराण, मत्स्यपुराण, वराहपुराण यासह महाभारतात उल्लेख आढळून येतो. या योगावर पिंडदान, श्राद्ध, तर्पण विधी केल्यास कमीत कमी १३ वर्षांपर्यंत पितर किंवा पूर्वज तृप्त आणि प्रसन्न राहतात, अशी मान्यता आहे.