समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढावी, म्हणून दैनंदिन जीवनात 'या' पाच गोष्टींचा समावेश करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:37 AM2021-05-03T11:37:50+5:302021-05-03T11:47:47+5:30

आपले प्रयत्न, धडपड, मेहनत या सगळ्या गोष्टी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरू असतात. त्यात कधी यश येते, तर कधी अपयश. यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांबरोबरच साथ लागते, ती नशिबाची! आपल्या नशिबाची चक्रे आपल्या कार्याला अनुकूल दिशेने फिरावीत, यासाठी ज्योतिष शास्त्रात काही साधे सोपे उपाय सांगितले आहेत. त्यांचा समावेश आपल्या दैनंदिन कार्यात केला, तर त्याचा निश्चितच लाभ होऊ शकेल. त्या गोष्टी कोणत्या, ते पाहूया.

पूर्वी शाही स्नानात पंचामृत, गंध, अत्तर, सुगंधी फुले, उटणे इ. गोष्टींचा वापर केला जात असे. या गोष्टी केवळ सौंदर्य प्रसाधन म्हणून नाही, तर त्याचा उपयोग ग्रहस्थिती बदलण्यासाठी देखील केला जात असे. आताच्या काळात शाही स्नान शक्य नसले, तरी आपल्या अंघोळीच्या पाण्यात गूळ, हळद, मध, साखर, मीठ किंवा पिवळी फुले यापैकी कोणत्याही गोष्टीचा समावेश करावा.

रोज सकाळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याचा श्लोक म्हणावा. सूर्यनमस्कार घालून सूर्याची १२ नावे घ्यावीत. असे नित्यनेमाने केले असता सूर्यासारखे तेज प्राप्त होईल.

सामाजिक प्रतिष्ठेत वाढ व्हावी, यासाठी दुर्गा सप्तशतीच्या दुसऱ्या अध्यायाचे नियमीत वाचन करावे. देवीची कृपादृष्टी लाभेल. या ग्रंथात देवीच्या पराक्रमाचे गुणवर्णन केले आहे. ते वाचन केल्यामुळे आपले चित्त शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

पक्ष्यांना दाणा पाणी घालावे. दानाचे पुण्य लाभते. त्यांच्या किलबिलाटाने आपल्या अंगणात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली एका पातेल्यात पाणी ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी धुणं भांड्यासाठी वापरावे. तसे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पद प्रतिष्ठा प्राप्त होते, असे वास्तू शास्त्रात सांगितले आहे.