Guru Purnima 2021: गुरुपौर्णिमा: गुरुशिष्यपरंपरा टिकून राहिली ती ‘या’ प्रख्यात गुरुशिष्यांच्या जोडीमुळेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:31 AM2021-07-23T11:31:28+5:302021-07-23T11:40:09+5:30

Guru Purnima 2021: इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, ज्या कायम लक्षात राहतील.

आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. (the great guru and shishya)

जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे.

अगदी प्राचीन काळापासून गुरु-शिष्यांचे अतूट नाते आपल्याला पाहायला मिळते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. इतिहासात अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या. आधुनिक काळातही अनेक गुरु-शिष्य आपल्याला पाहायला मिळतात.

अनेकदा शिष्यामुळे गुरुचे नाव मोठे झाल्याचेही पाहायला मिळते. गुरुने दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश, प्रगती, कीर्तीसह लोककल्याणासाठी झटतो, तोच खरा शिष्य, असे मानले जाते. आजच्या काळात गुरु आणि शिष्य यांच्या व्याख्या अतिशय बदलल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, ज्या जगभरात कायम लक्षात राहतील.

वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरु होते. राजा दशरथ आणि श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचेही गुरु होते. वेद, पुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम, प्रचंड पराक्रमी बनवले. श्रीरामांसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही अतूल्य मार्गदर्शन केले. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषिंमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

परंपरागत उल्लेखांनुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ म्हणतात. महाभारतातील उल्लेखावरून स्वत: व्यासांनी २४,००० श्लोकांचे उपाख्यानविरहित भारत रचिले व त्यांचा शिष्य वैशंपायन याने त्यात आख्यानोपाख्यानादिकांची भर घालून त्याला सुमारे एक लाख श्लोकसंख्या असलेल्या सध्याच्या महाभारताचे रूप दिले, असे आढळून येते. व्यासांनी त्यांच्या चार शिष्यांपैकी प्रथम शुकाला महाभारत शिकविले, असे सांगितले जाते.

विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आणि सात चिरंजीवांपैकी एक मानले जाणारे परशुराम. महादेव शिवशंकरांनी त्यांना शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम धनुर्विद्येत विशेष निष्णात होते. परशुरामांनी भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धनुर्विद्या शिकविली. याशिवाय कर्णाने स्वतः परशुरामांची सेवा करत अनेक विद्या शिकून घेतल्या, असाही उल्लेख आढळतो.

कौरव–पांडवांचे धनुर्विद्येतील गुरु व भारतीय युद्धातील कौरवांचे एक सेनापती म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख आढळतो. सर्व कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्यादिकांत त्यांनी निष्णात केले. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्टिराला रथयुद्ध व नकुलसहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले.

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरुकूल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या. वेद-पुराण यांच्यासह धर्मातील अनेक गोष्टींची भरपूर माहिती दिली, असे सांगितले जाते.

एक सूक्तकर्ते ऋषी, राजपुरोहित, मुळात क्षत्रिय राजे असूनही कठोर तपःश्चर्येच्या सामर्थ्यावर ‘ब्रह्मर्षी’ ही पदवी प्राप्त करणारे, ऋग्वेदातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायत्री मंत्राचे कर्ते, वसिष्ठांचे शत्रू अशा अनेक नात्यांनी ‘विश्वामित्र’ हे नाव वैदिक साहित्यात तसेच पुराणे, महाकाव्ये अशा उत्तरकालीन साहित्यात आलेले आढळते. विश्वामित्रांनी श्रीराम व लक्ष्मणाला धनुर्विद्या आणि अनेक शस्त्रास्त्रविद्या दिली. श्रीराम आणि सीता यांच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला.

आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही ओळखले जाते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. आपल्या मुसद्देगिरीच्या जोरावर आर्य चाणक्य यांनी अखंड भारताचे निर्माण केल्याचे मानले जाते.

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे, असा आश्वासक मंत्र देणारे स्वामी समर्थ हे गजानन महाराज आणि साईबाबा यांचे गुरु होते, असे सांगितले जाते. स्वामी समर्थांनी दिलेल्या आदेशानुसार गजानन महाराज शेगावला, तर साईबाब शिर्डीला आले, असे सांगितले जाते.