तिन्हीसांजेला नेमके कोणत्या देवतांचे पूजन करावे? 'हे' नियम पाळा, उत्तम लाभ मिळवा

By देवेश फडके | Published: January 11, 2021 06:32 PM2021-01-11T18:32:28+5:302021-01-11T18:40:30+5:30

भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये आराध्य देवतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना हा अगदी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे पाहायला मिळते. कुलदेवतांसोबत आराध्य देवतांचे पूजनही न चुकता केले जाते. तिन्हीसांजेला कोणत्या देवतांचे पूजन करावे; तसेच तिन्हीसांजेला व्रत-वैकल्ये किंवा पूजन करताना नेमके काय करावे, याबाबतीत काही नियम सांगितले जातात. जाणून घेऊया...

भारतीय संस्कृतीत परंपरा, चालिरिती, कुळाचार, कुळधर्म यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे आपण पाहतो. कुळाचार, कुळधर्म म्हणूनही अनेक गोष्टी घरोघरी केल्या जातात. अनेक कुटुंबात एखादी प्रथा, परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये आराध्य देवतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना हा अगदी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे पाहायला मिळते. कुलदेवतांसोबत आराध्य देवतांचे पूजनही न चुकता केले जाते.

मानसिक शांतता, प्रसन्नता लाभण्यासाठी देवतांचे पूजन, नामस्मरण उपयुक्त असल्याचे मानले जाते. कुलदेवता आणि आराध्य देवता यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख, शांतता, समृद्धी वृद्धिंगत होते. कुटुंबातील सदस्यांना देवतांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवतांच्या पूजनामुळे समाधानाची अनुभूती मिळते, असे अनेकांकडून सांगितले जाते. आपल्याकडे सकाळी देवतांचे मुख्य पूजन आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावणे, धूप घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे. अनेक व्रत-वैकल्ये तिन्हीसांजेला केली जातात.

तिन्हीसांजेला कोणत्या देवतांचे पूजन करावे; तसेच तिन्हीसांजेला व्रत-वैकल्ये किंवा पूजन करताना नेमके काय करावे, याबाबतीत काही नियम सांगितले जातात. यासंदर्भात माहिती नसल्यामुळे अनेकांकडून अनावधानाने चुका घडण्याची शक्यता असते. तिन्हीसांजेला किंवा रात्री कोणत्या देवतांची पूजा करावी आणि नेमके कोणते नियम आवर्जुन लक्षात ठेवावेत? जाणून घेऊया...

काही पुराणांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्रीच्या वेळी सूर्यपंचदेवतांचे पूजन करणे वर्ज्य मानले गेले आहे. आपल्याकडे काही व्रते प्रदोष काळात केली जातात. त्यावेळी देवतांचे पूजन करावे. मात्र, अन्यवेळी सूर्यपंचायत देवतांचे पूजन करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तिन्हीसांजेला देवासमोर आवर्जुन दिवा लावावा. तसेच शक्य असल्यास लोबान, कापूरमिश्रित धूप घालावा. यामुळे घरातील सकारात्मकता वाढते. वातावरण शुद्ध होते, असे सांगितले जाते.

अनेक कुटुंबांमध्ये सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर शंखनाद करण्याची पद्धत आहे. मात्र, पुराणांतील काही उल्लेखांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्रीचे पूजन करताना शंखनाद करू नये. कारण सूर्यास्तानंतर देवता आराम करायला जातात, अशी मान्यता आहे. तसेच तिन्हीसांजेला किंवा रात्री केलेल्या शंखनादामुळे देवतांच्या साधनेत व्यत्यय येऊ शकतो. तसेच वायुमंडळात अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म जीवांनाचा वास बाधित होतो. त्यामुळे शंखनाद करू नये, असे सांगितले जाते.

घंटानाद केल्यामुळे सकारात्मकता संचारते. उत्साह, चैतन्य निर्माण होते, असे मानले जाते. सकाळी केल्या जाणाऱ्या देवपूजनावेळी आवर्जुन घंटानाद केला जातो. घरातील देवतांच्या पूजनावेळी घंटिका देवीची पूजाही केली जाते. मात्र, पुराणातील काही मान्यतांनुसार, तिन्हीसांजेच्या पूजेवेळी किंवा देवासमोर दिवा लावताना घंटानाद करू नये, असे सांगितले जाते. घंटानाद केल्याने वायुमंडळातील सूक्ष्म जीवांच्या वास बाधित होतो, अशी मान्यता असल्याने सूर्यास्तानंतर घंटानाद करणे शक्यतो टाळावे, असे सांगितले जाते.

भगवान विष्णूंसह अनेक देवतांच्या पूजनात आवर्जुन तुळशीचा वापर केला जातो. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तुळशीच्या पानाचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. मात्र, तिन्हीसांजेला तुळशीची पाने खुडू नयेत. एवढेच नव्हे, तर तुळशीच्या पानांना स्पर्शही करू नये, असे सांगितले जाते. तिन्हीसांजेच्या पूजेला सकाळीच तुळशीची पाने खुडून ठेवावीत, असे सांगितले जाते.

देवतांचे पूजन करताना दिशा अतिशय महत्त्वाची मानली जाते. देवतांचे पूजन ठराविक दिशांनाच करणे शुभ आणि लाभदायक मानले जाते. वास्तुशास्त्रात यासंदर्भातील माहिती मिळते. तिन्हीसांजेला किंवा रात्रीच्या वेळी पूजा करतानाची दिशा उत्तर असावी, असे सांगितले जाते.