रामायणातली 'ती' आठ ठिकाणे आज कुठे, कशी आणि कोणत्या स्थितीत आहेत, जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:17 PM2021-03-18T12:17:09+5:302021-03-18T12:34:45+5:30

रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त्या परिसरालाही जिथे खुद्द प्रभू श्रीराम यांनी वास्तव्य केले होते. जिथे त्यांचा वावर होता. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आठ ठिकाणे त्यांच्या अस्तित्वाची साक्षीदार आहेत. तिथे जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेही आपले मन मोहरून उठते. तिथे प्रत्यक्ष जाता आले, तर याहून सुंदर योग कोणता?

आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर गीत रामायणात वर्णन करतात, 'अयोध्या मनु निर्मित नगरी!' रामायण काळात ती कोसल देशाची राजधानी होती. हीच ती पावनभूमी जिथे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे युगपुरुष जन्माला आले. तेव्हाची अयोध्या आज उत्तर प्रदेशाचा भाग म्हणून ओळखली जाते. तिथे प्रभू रामाच्या जन्माचे अनेक दाखले मिळतात. हजारो भाविक, तसेच पर्यटक त्या पुण्यभूमीच्या दर्शनाला येतात आणि आता तर तिथे राम मंदिर स्थापन होणार आहे. त्यामुळे रामाची अयोध्या राम मंदिराच्या भव्य वास्तुमुळे जगाचे लक्ष वेधून घेऊ शकेल.

हे ते ठिकाण आहे, जिथे १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतत असताना प्रभू श्रीराम, सीता माई आणि लक्ष्मण यांनी काही काळ विश्रांती घेतली होती. हे ठिकाण आज इलाहाबाद म्हणून ओळखले जाते. ते देखील उत्तर प्रदेशाचा भाग आहे. पुराणात, रामायणात, महाभारतात या स्थळाचा उल्लेख आढळतो. या पवित्र स्थानी आजही मोठ्या प्रमाणात कुंभमेळा भरतो.

१४ वर्षांचा वनवास भोगण्यासाठी प्रभू श्रीराम, सीता माई आणि लक्ष्मण यांनी दंडकारण्यातून फिरत चित्रकूट पर्वताची जागा निवासासाठी निवडली होती. तिथे त्यांनी ११ वर्षे वास्तव्य केले होते. राजा दशरथ यांची निधनवार्ता घेऊन भरत त्याच ठिकाणी आला होता. भरताने त्यांना परत येण्याचा आग्रह देखील केला होता. परंतु रामांनी त्याला राज्य सांभाळण्याचा आदेश दिला आणि परत पाठवले. आजही राम आणि सीतेचे पदचिन्ह त्या ठिकाणी पहावयास मिळते. हे ठिकाण आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या मध्यावर आहे. तिथे आता रामाची अनेक मंदिरे आहेत.

हे माता सीतेचे जन्मस्थान. तिथेच सीतेचे स्वयंवर देखील झाले होते आणि प्रभू श्रीराम यांच्याशी विवाह झाला होता. हे स्थान सद्यस्थितीत भारत नेपाळच्या सीमेवर काठमांडूच्या दक्षिण भागात स्थित आहे.

लंकापती रावणावर चाल करून जाण्यासाठी प्रभू श्रीराम आणि हनुमंताची वानर सेना यांनी जो रामसेतू बांधला ते ठिकाण रामेश्वरम म्हणून ओळखले जाते. रामसेतूची रचना भक्कम असावी आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी समुद्र देवतेच्या सांगण्यावरून श्रीरामांनी शिवशंकराचे ज्योतिर्लिंग स्थापन केले होते. तेच ज्योतिर्लिंग आज मुख्य तीर्थक्षेत्रांपैकी एक गणले जाते. हे ठिकाण दक्षिण भारतातील तामिळनाडू येथे स्थित आहे. आजही शास्त्रज्ञ पौराणिक महत्त्व असलेल्या रामसेतूचा अभ्यास करत आहेत.

रामायणात हे ठिकाण वानरराज वाली आणि त्याच्या मृत्यूपश्चात सुग्रीव यांची राजधानी सांगितली जाते. वालीच्या मृत्यूनंतर प्रभू रामांनी लक्ष्मणाच्या हातून अभिषेक करून घेत किष्किंधाचे राज्य सुग्रीवाकडे सुपूर्त केले होते. आजच्या काळात हे ठिकाण कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र हंपी या नावे ओळखले जाते. युनेस्कोने या शहराला ऐतिहासिक शहराचा दर्जा दिला आहे.

असे घनदाट वन जिथे दिवसादेखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नसे. दंडकारण्यात असुरांचे साम्राज्य होते. त्या असुर भूमीवर पहिल्यांदाच सहा मानवी पावले उमटली होती. तिथे राहून श्रीरामांनी असुरांचा नायनाट केला आणि कुटी बांधून वास्तव्य केले होते. तिथे रावणाची बहीण शूर्पणखा रामाच्या भेटीला आली आणि सीता अपहरणाच्या प्रसंगाची ठिणगी पडली होती. आजही हे घनदाट वन ओडिसा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या परिसरातील वन विभागाला व्यापून आहे. संशोधकांना तिथल्या वनात राम-सीतेच्या अस्तित्वाच्या खुणा सापडत आहेत. तिथे आजही किर्रर्र अंधार आणि असीम शांतता मिळते.

रावणाशी युद्धाला कटिबद्ध झालेल्या प्रभू रामांनी श्रीलंकेत पोहोचल्यावर पहिल्यांदा तालिमन्नार येथे आपल्या तुकडीसह तळ ठोकला होता. रावणाशी भीषण युद्ध करून त्याला जीवानिशी मारल्यावर रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण याला सिंहासनावर बसवून श्रीरामांनी आपला मुक्काम हलवला होता. आजही रामेश्वरम ते रामसेतू जोडल्याचे चिन्ह बघायला मिळतात. याच ठिकाणी माता सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. हे ठिकाण श्रीलंका येथील मन्नार आईसलँडवर स्थित आहे. .

टॅग्स :रामायणramayan