उद्या उत्पत्ती एकादशीनिमित्त बारा राशींनी दिलेले उपाय करा आणि विष्णुकृपेस पात्र व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:48 PM2021-11-29T12:48:22+5:302021-11-29T12:56:53+5:30

एकादशी ही तिथी मुळातच पवित्र तिथी आहे. ती भगवान विष्णूंची प्रिय तिथी म्हणूनही ओळखली जाते. म्हणून अनेक हरिभक्त विष्णूंची उपासना म्हणून आणि आपले पापक्षालन व्हावे म्हणून महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीला उपास करतात आणि उपासना देखील करतात. आजच्या काळात अनेकांना अनेक समस्यांमुळे, व्याधींमुळे उपास शक्य होतोच असे नाही, म्हणून ज्योतिष शास्त्राने पर्याय म्हणून सुचवलेली सहज सोपी उपासना आपण जरूर करा.

दानाचे महत्त्व जाणून घेऊन एकादशीच्या निमित्ताने यथाशक्ती गरिबांना दान करा. दानाच्या वस्तू जीवनावश्यक असतील याची काळजी घ्या. थंडीचे दिवस असल्याने गरजूंना शाल, चादर, कच्चे धान्य, शिजवलेले धान्य दान करू शकता.

गायीला चारा घाला. दिवसभरातला थोडा वेळ राखीव ठेवून गोशाळेत सेवा करा. किंवा एखाद्या गायीला पोळी, भाकरी खाऊ घाला. तुमच्या परिसरात गाय नसेल तर कुत्र्याला बिस्कीट, पोळी, भाकरी घाला. अन्नदान होणे महत्त्वाचे!

भगवंत कोणत्या स्वरूपात येऊन कसा आशीर्वाद देईल सांगता येत नाही. म्हणून मिथुन राशीने एकादशीचे औचित्य साधून विष्णूंच्या मत्स्यावताराला स्मरून माशांना अन्न घालावे.

भक्तीने वाहिलेली, अर्पण केलेली कोणतीही गोष्ट भगवंताला पोहोचते. त्यांच्यात भेद न करता आपल्या आराध्य दैवताला भक्तिभावे फळ, फुल अर्पण केले तरी ते विष्णूंना पोहोचते.

भगवान विष्णूंना तुळशी आणि कमळ खूप प्रिय आहेत. एकादशीच्या मुहूर्तावर १०८ कमळ वाहण्याचा संकल्प अवघड वाटत असेल तर सहज उपलब्ध होणारे तुळशी दल विष्णू सहस्त्र नाम म्हणत विष्णूंना अर्पण करा.

एकादशी ही तिथी अध्यात्माची वाट धरायला लावणारी तिथी आहे. म्हणून या दिवशी दोन्ही वेळेस भोजन टाळून उपासनेत मन रमवले जाते. घरात राहून मग प्रपंचात गुंतून राहते म्हणून दिवसभरात वेळ मिळाला की वटवृक्ष किंवा पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून यावे.

अन्नदान ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा गरजूंना यथाशक्ती दान देत जा. एकादशीनिमित्त गरीब मुलांना दूध, दही दान करता येईल.

शिजवलेले अन्न दान करणे शक्य नसेल तर शिधा दान करा. त्यालाच कदान्न किंवा कच्चे अन्न म्हणजेच धान्य असे म्हणतात. पैशांची मदत शक्य नसली तरी मूठभर तांदूळ, डाळ, एखादी भाजी देऊन आपण कोणाच्या एकवेळच्या जेवणाला हातभार लावू शकतो.

गरजूंची सेवा करणे ही सुद्धा ईश सेवा मानली जाते. अडल्या-नडलेल्याला मदतीचा हात देणे यासारखे महापुण्याचे दुसरे काम नाही.तुमच्या परिसरातील अशा गरजू व्यक्तीची मदत करा, ती सेवा विष्णूंना पोहोचेल.

मनुष्याप्रमाणे प्राणिमात्रांनाही गरज असते मदतीची. यासाठी उन्हाळ्यात पाणी देणे, पावसाळ्यात निवारा बांधायला जागा देणे आणि हिवाळ्यात धान्य, कडधान्य घालून त्यांच्या पोटापाण्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला जागून पशु पक्ष्यांना चारा पाणी घाला.

एकादशी निमित्त भजन अथवा भोजन सेवा देऊन विष्णू भक्ती करू शकता. यासाठी एखाद्या मंदिरात सेवा द्या अथवा एखाद्या गरजूला यथाशक्ती अन्नदान करा.

सेवेचे अनेक मार्ग आहेत. ज्यांना आर्थिक मदत जमते त्यांनी आर्थिक सहाय्य करावे, ज्यांना अन्न, वस्त्र किंवा अन्य काही सेवा करता आली तर त्यांनी ती करावी आणि ज्यांना काहीच शक्य नाही अशा बुजुर्ग मंडळींनी 'ओम विष्णवे नमः' या मंत्राचा जप करून मनोभावे उपासना करावी.