Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:45 IST2025-06-21T17:43:03+5:302025-06-21T17:45:38+5:30
Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी(Ashadhi Ekadashi 2025) महाराष्ट्राच्या ठिकठिकाणाहून जवळपास ३०० दिंड्या पंढपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत, त्यात लाखो भाविकांचा समावेश आहे. पुरुषांच्या गळ्यात टाळ, मृदूंग तर महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असल्याचे निदर्शनास येते. पण हे तुळशी वृंदावन नेण्याचे कारण काय ते जाणून घेऊ.

प्रवासात सामान जेवढे कमी तेवढा प्रवास सुखकर असा नियमच आहे. हे माहीत असूनही तुळशी वृंदावनाचा भार डोक्यावर नेताना वारकरी महिलांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा आल्याचे दिसत नाही. उलट नाचत, गात, ओव्या, अभंग म्हणत पालखी, मिरवणूक, दिंड्या मार्गक्रमण करतात. यात तुळशी वृंदावन डोईवर नेण्यामागचे कारण जाणून घेऊ.
तुळस डोक्यावर घेऊन चालणं म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ दर्शवणं, अशी या महिलांची श्रद्धा असते. हे श्रद्धेचं पाऊल आहे, जे प्रत्येक पावलागणिक त्याच्या जवळ नेणारं आहे. हा परंपरेचा भाग आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आलाय.
तुळस ही फक्त वनस्पती नाही, तर विठ्ठलाची प्रिय सखी आहे, तिला हरिप्रिया असेही म्हणतात! ती पवित्रता, भक्ती आणि समर्पणाचं ती प्रतीक आहे. वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात, कारण त्या विठ्ठलाला आपली निष्ठा आणि प्रेम दर्शवतात आणि तुळशीप्रमाणे आपला पवित्र भाव दर्शवतात.
वैज्ञानिकदृष्ट्याही तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस प्राणवायू देते आणि कार्बन डायऑक्साइड शोषते. डोक्यावर तुळस घेतलेली प्रत्येक महिला २०-२५ फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवते. यामुळे सगळ्यांना शुद्ध हवा मिळते.
तुळशीत अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुण आहेत. त्यामुळे हवेतले जंतू कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वारीत चालणाऱ्या महिलांच्या आरोग्याचेही रक्षण होते. म्हणून तुळस ही फक्त श्रद्धेचं नाही, तर आरोग्याचंही प्रतीक आहे!