तुम्हाला तुळशीचे नेमके किती प्रकार माहिती आहेत? वाचा, मंजिरीचे महत्त्व व फायदे

By देवेश फडके | Published: January 10, 2021 04:44 PM2021-01-10T16:44:52+5:302021-01-10T16:49:14+5:30

भारतात अनेकविध प्रकारची जैवविविधता आढळून येते. धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानल्या गेलेल्या तुळशीचे सुमारे १० प्रकार आपल्याकडे आढळून येतात. तुळशीप्रमाणे मंजिरीही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे.

तुळस हे मांगल्याचे प्रतीक असल्याचे मानले जाते. घरात तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाते. भारतीय परंपरांमध्ये तुळशीचे अनेक फायदे सांगितले जातात. वैष्णव परंपरेतही तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे.

पुराणातील काही संदर्भानुसार, ज्या घरात तुळस लावलेली असते आणि नियमित तिचे पूजन केले जाते, त्या घरांवर लक्ष्मी देवीची नेहमी कृपा असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळशी वृदांवनामुळे वातावरण पवित्र राहते. तुळशीमुळे नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो. तुळस असलेल्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात, असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत आरोग्याला हे उत्तम धन आणि निरोगी काया समृद्धीचे लक्षण मानले गेले आहे.

तुळशीच्या मंजिरीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे शास्त्रांत सांगण्यात आले आहे. तुळशीच्या मंजिरी श्रीविष्णूंना वाहिल्यास ते प्रसन्न होतात. त्यांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आयुर्वेदात तुळशीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून, तुळशीची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

मंजिरी काढली नाही, तर तुळशीची वाढ खुंटते. त्यामुळे ती काढणे आवश्यक असते, असे म्हटले जाते. तुळशीच्या बिया अत्यंत आरोग्यदायी असतात. तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो. तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून त्यानंतर दुधात मिसळून त्याचे सेवन करावे, असे सांगितले जाते.

वैष्णव सांप्रदायात तुळशीची माळ आवर्जुन घातली जाते. तुळशीची माळ गळ्यात घालणे उत्तम मानले गेले आहे. तसेच तुळशीच्या माळेचा वापर करून नामस्मरण करणे कल्याणकारी मानले गेले आहे. तुळस म्हणजे मूर्तिमंत सात्त्विकता. तिचा स्पर्शसुद्धा प्रचंड ऊर्जा देतो. तिच्या नुसत्या अस्तित्वानेही वातावरणात शुद्धतेचा प्रवाह वेगाने प्रवाहित होऊन मन प्रसन्न व आनंदित होते, असे सांगितले जाते.

भारतात सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक वैविध्य जितके आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने जैवविविधता आपल्याला आढळून येते. यासह फळांच्या, फुलांच्या, झाडांच्या विविध जाती, प्रकारही आपल्याला आढळतात. तसेच तुळशीचे काही प्रकार आढळून येतात. एक, दोन नव्हे तर तब्बल १० प्रकार तुळशीचे सांगितले गेले आहेत.

तुळशीचे अनेक प्रकार आढळून येतात. सर्वसाधारण तुळशीसह श्रीकृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, श्वेत तुळस, भू तुळस, राम तुळस, नील तुळस, रक्त तुळस, वन तुळस आणि ज्ञान तुळस हे काही तुळशीचे मुख्य प्रकार आहेत. तुळशीच्या प्रत्येक प्रकाराचे गुणधर्म वेगळे आणि विशेष आहेत. तुळशीच्या अनेकविध नावांवरूनही तिचे वेगळेपण लक्षात येते.

तुळशीच्या पानांचे नियमितपणे केलेले सेवन कफ, ज्वर, खोकला आणि हृदयरोग यांसारख्या आजार, विकारांवर अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितले जाते. एखाद्या झाडाचे किंवा रोपट्याचे पान तोडल्यास ते काही तासांत सुकून जाते. तुळशीचे पान सात दिवसांपर्यंत शिळवट होत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

Read in English