उन्हाळा सुरु होतोय; आवडत्या कारची काळजी कशी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:34 PM2019-04-02T14:34:29+5:302019-04-02T14:38:48+5:30

होळीनंतर उकाड्याने हैराण केले आहे. हाच उन्हाळा कारसाठीही अपायकारक असतो. एसी, टायर, रंग यासह बऱ्याच बाबींसाठी हा उन्हाळा तापदायक असतो. यामुळे वेळीच कारची काळजी घेतल्यास प्रवासाला जाताना अडचणी येणार नाहीत. आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत.

जेव्हा ही उन्हामध्ये तुम्ही कार पार्क करत असाल तर तिच्या काचा पूर्ण बंद ठेवू नका. कमीतकमी अर्धा इंच किंवा त्यापेक्षा कमी खाली करून काचा ठेवा. याचा फायदा असा असेल की हवा आत-बाहेर जात राहील आणि गाडी जास्त गरम होणार नाही. जर कार बंद राहिली तर आतमध्ये गॅस बनू शकते. यामुळे लहान मुले आतमध्ये असल्यास त्यांना प्राणास मुकावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

उन्हाळ्यात कारमध्ये एसी खूप गरजेचा आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वी एसीचे सर्व्हिसिंग करून घ्यावे. एसीचे कुलिंग बंद झाल्यास एसीचा गॅस संपल्याचे समजावे. तो भरून घ्यावा. एसी ट्यूब आणि व्हॉल्वलाही साफ करणे गरजेचे आहे. एसीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कंडेन्सर असतो.

उन्हाळ्यात इंजिनही इतर ऋुतुंपेक्षा जास्त तापते. हे इंजिन थंड ठेवण्यासाठी कुलंट योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. लांबच्या दौऱ्यावर जायचे असल्यास कुलंट तपासावे. अन्यथा कार ओव्हरहिट होऊन इंजिन सीज होण्याचा धोका असतो.

जादातर कारमधील बॅटऱ्या या मेन्टेनन्स फ्री असतात. त्यांचा मेन्टेनन्स ठेवण्याची सारखी गरज राहत नाही. मात्र, जुन्या प्रकाराची बॅटरी असल्यास तिचा मेन्टेनन्स ठेवणे गरजेचे आहे. जर बॅटरीमध्ये पाणी कमी असल्यास डिस्टिल वॉटर टाकू शकता. बॅटरीमध्ये अॅसिड तयार होते. यामुळे सावधानता बाळगावी.

कारचे इंजिन जेवढे गरम होईल तेवढे ऑईल वापरेल. यामुळे ऑईलची पातळी, घनता तपासावी.

खराब झालेले ऑईल असल्यास ते बदलावे. पातळी कमी असल्यास टॉपअप करावे. वेळोवेळी याची तपासणी करावी.

कारमध्ये इंधन भरताना काळजी घ्यावी. उन्हाळ्यात टँक फूल करूच नये. पेट्रोल पंपावर नोझलमध्ये सेन्सर असतो. त्याला इंधन लागल्यास इंधन भरणे बंद होते. तिथपर्यंतच इंधन भरावे. उगाच टाकी फूल करण्याच्या फंदात पडू नये. कारण तापल्याने इंधनाची घनता कमी होते आणि इंधन वाढते. तसेच बाष्पीभवनही होते. यामुळे टाकी काही प्रमाणात रिकामी ठेवावी.

जर कारच्या टायरमध्ये हवा कमी असले तर ती कार चालविणे धोक्याचे ठरू शकते. कार एका बाजुला ओढली जाते शिवाय मायलेजवरही परिणाम होतो. टायरमधील हवा वेळोवेळी तपासावी. उभ्या असलेल्या कारच्या टायरमधील हवा लवकर कमी होते. उन्हाळ्यात नायट्रोजन उपलब्ध असल्यास टायरमध्ये भरावा. यामुळे टायर कमी तापतो.