मारुती, टाटा, महिंद्रा तणावाखाली; सलग पाचव्या महिन्यामध्ये कारविक्री घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 08:45 AM2019-06-03T08:45:49+5:302019-06-03T08:49:41+5:30

गेल्या काही महिन्यांपासून वाहन उद्योगाला मरगळ आली असून त्याचा फटका विक्रीवर बसला आहे. मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांनी नवनवीन कार लाँच करूनही त्यांची विक्री कमालीची घटली आहे. सर्वाधिक फटका मारुती, टाटा आणि ह्युंदाईला बसला असून यामुळे वाहन क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे.

मारुती सुझुकीने मे महिन्यातील विक्री जाहीर केली आहे. 2019 मध्ये कंपनीने एकूण 134641 गाड्यांची विक्री केली आहे. तर याच महिन्यात 2018 मध्ये कंपनीने 172512 वाहनांची विक्री केली होती. या महिन्यात कारच्या विक्रीमध्ये 22 टक्क्यांनी घट झाली आहे. घरगुती बाजारामध्ये 121,018 वाहनांची विक्री केली आहे. 2018 मध्ये या महिन्यात 161,497 वाहनांची विक्री झाली होती. ही घट 25 टक्के आहे.

महिंद्राच्या कारविक्रीमध्ये 3 टक्क्यांची घट झाली. मे 2019 मध्ये एकूण 45421 गाड्यांची विक्री झाली. तर 2018 मध्ये 46848 वाहनांची विक्री झाली होती.

ह्युंदाई मोटरलाही कार विक्रीचा मोठा फटका बसला आहे. मे 2019 मध्ये एकूण 42502 गाड्यांची विक्री झाली. तर 2018 मध्ये याच काळात 45008 गाड्यांची विक्री झाली होती.

टोयोटाच्या गाड्यांनाही मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या एकूण 13940 गाड्यांची विक्री झाली आहे. ही विक्री गेल्या वर्षीपेक्षा 6 टक्क्यांनी घटली आहे.

टाटा मोटर्सलाही बाजारातील मंदीचा झटका बसला आहे. मे 2019 मध्ये कंपनीने एकूण 40,155 वाहनांची विक्री केली होती. 2018 मध्ये 54290 वाहनांची विक्री नोंदली गेली होती. एकूण 26 टक्क्यांचा फटका टाटा मोटर्सला बसला आहे.

होंडाच्या कारनाही विक्रीचा फटका बसला आहे. 2019 मध्ये भारतीय बाजारात कंपनीने एकूण 11442 कार विक्री केली होती. तर 2018 मध्ये हा आकडा 15864 एवढा होता. एकूण 27.87 टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे.