दिव्यागांची दमदार कामगिरी; वारा-पाऊस झेलत कठीण गोरखगडची मोहीम केली फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 06:53 PM2021-08-02T18:53:18+5:302021-08-02T19:02:44+5:30

मोहिमेतील सहा दिव्यांगा पैकी चार दिव्यांग हे पोलिओग्रस्त कुबड्या व कॅलिफर्स वापरणारे आहेत.

पैठण ( औरंगाबाद ) : घनदाट कारवी कर्दळीच्या जंगलातून सहा दिव्यांगांनी शुक्रवारी सायंकाळी गोरखगड किल्ल्यावर चढाईस सुरुवात केली.

खाच-खळगे, निसरड्या वाटा, ओढे-नाले, डोंगर-दऱ्या, झाडी झुडपातून एकमेकांना आधार देत दिव्यांग एक एक टप्पा पार करत होते, काळ्याकुट्ट अंधारात, मोबाईल बॅटरीच्या उजेडात तर कधीकधी धो-धो बरसणाऱ्या पावसाचा सामना करत रात्री बारा वाजता किल्ला सर करून दिव्यांगांनी मोहीम फत्ते केली.

मुरबाड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्यात असलेला ऐतिहासिक गोरखगड किल्ला कठीण व दुर्गम प्रकारात मोडतो. हा किल्ला २१३० फूट उंचीचा असून पैठण येथील शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग बाधवासाठी साहसी भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.

शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने ते महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर दिव्यांगांसाठी साहसी भटकंती मोहिमेचे आयोजन करतात.

यंदा प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांगांची गोरखगड किल्ल्यावर भटकंती मोहिम शुक्रवारी ( दि. ३० ) रोजी सुरु झाली. मोहिमेतील सहा दिव्यांगा पैकी चार दिव्यांग हे पोलिओग्रस्त कुबड्या व कॅलिफर्स वापरणारे होते.

या मोहिमेत भिवंडी येथील महिला दिव्यांग मनिषा पाटील यांच्यासह शिवाजी गाडे ( पैठण), कचरू चांभारे (बीड), जनार्दन पानमंद (रायगड), दत्ताभाऊ साळकर (औरंगाबाद) व मच्छिंद्र थोरात (पुणे) या दिव्यांगांनी सहभाग घेतला.

रात्री एकमेकांना आधार देत दिव्यांग बांधवांनी गोरखगडावर चढाई केली. या चढाईत कुणालाही दुखापत झाली नाही असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सांगितले.

मध्यरात्री किल्ला सर केल्यानंतर रात्रीचा मुक्काम गडावरील गुहेत करून ३१ जुलै रोजी गोरखगडावर भटकंती करण्यात आल्याचे शिवाजी गाडे यांनी सांगितले.