विदर्भातील वाहतुकीस १५ मार्चपर्यंत बंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:16+5:302021-03-06T04:17:16+5:30
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. ...
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात परभणीतून जाणाऱ्या खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली होती. या आदेशाची मुदत संपल्याने १५ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील आवागमनावर बंदी कायम आहे.
मोर्चा, निदर्शने, आंदोलनास बंदी
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने विविध पक्ष, संघटना यांच्याकडून करण्यात येणाऱ्या उपोषण, मोर्चे, निदर्शने आदी आंदोलनांना घालण्यात आलेले निर्बंध १५ मार्चपर्यंत कायम करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्बंध लागू केले होते. सद्य:स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या आदेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच धार्मिकस्थळेही १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धार्मिक स्थळामध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.
व्यापारी, विक्रेते, कर्मचाऱ्यांना चाचण्या करण्याचे आदेश
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, खाजगी व्यवस्थापनातील व्यापारी, कर्मचारी, फळविक्रेते, भाजीपाला, दूध, मटण, चिकनविक्रेते, रिक्षा, टॅक्सीचालक आदींना १६ एप्रिलपर्यंत आरटीपीसीआर किंवा ॲण्टीजेन टेस्ट करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तपासणी न करताच आस्थापना उघडल्यास संबंधितांवर मनपा आयुक्त, न.प. मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी तसेच व्यापारी आस्थापनांशी संबंधित कार्यालयाने कार्यवाही करावी, असेही या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. पोलिसांना ध्वनिक्षेपकाद्वारे याबाबतची माहिती जनतेला देण्याचेही आदेशात नमूद केले आहे.