ग्रामपंचायतीसाठी वेगळाच राजकीय पट; पक्षीय विचारांना बाजूला सारुन विरोधक आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:56 PM2021-02-17T16:56:13+5:302021-02-17T16:58:31+5:30

राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, नि:स्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत.

Separate political fold for Gram Panchayat; Opponents came together, putting aside partisan views | ग्रामपंचायतीसाठी वेगळाच राजकीय पट; पक्षीय विचारांना बाजूला सारुन विरोधक आले एकत्र

ग्रामपंचायतीसाठी वेगळाच राजकीय पट; पक्षीय विचारांना बाजूला सारुन विरोधक आले एकत्र

Next
ठळक मुद्देस्व:हित साधण्यासाठी व्यक्तिनिष्ठतेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा महाविकास आघाडीतील घटक पक्षापेक्षा विरोधातील पक्षाचे कार्यकर्ते जवळचे

- अभिमन्यू कांबळे

परभणी : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजूला सारून राज्य पातळीवर एकमेकाविरोधात असलेल्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, नि:स्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत. स्व:हित साधण्यासाठी व्यक्तिनिष्ठतेलाच पक्षनिष्ठेचा मुलामा देऊन तत्त्वनिष्ठतेच्या गप्पा राजकीय नेते मंडळी व काही कार्यकर्त्यांकडून हाकल्या जात आहेत. परभणी जिल्ह्याचे राजकारणही गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील नेतेमंडळींची मुंबईत पत राहत नाही. परिणामी जिल्ह्याच्या विकासाची झोळी बहुतांश वेळा रिकामीच राहते. आतापर्यंत जिल्हास्तरावरील नेत्यांकडून रावबविण्यात येणारा हा पॅटर्न आता गावपातळीवरील कार्यकर्तेही राबवू लागले आहेत. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हावासीयांना अनुभवयास मिळाली. 

राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या ३ पक्षांचे सरकार सत्तेत आहे. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्यांची आघाडी होणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षापेक्षा विरोधातील पक्षाचे कार्यकर्ते जवळचे वाटल्याचा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सरपंच पद मिळविण्यासाठी झाल्याचे दिसून आले. विशेषतः जिंतूर व सेलू तालुक्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली. या तालुक्यांत भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. विजय भांबळे याच्यात कट्टर राजकीय वाद असताना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ग्रा. प. निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र आले. त्यात जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे भाजप व राष्ट्रवादीच्या पॅनलमध्येच लढत झाली असताना, समसमान जागा मिळाल्याने सरपंच पद मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले. असेच चित्र धमधम, सावंगी म्हाळसा, टाकळखोपा, सायखेडा (बामणी), धानोरा बु. या ग्रामपंचायतीतही पहावयास मिळाले. 
सेलू तालुक्यातही अशी परिस्थिती ही गावांमध्ये पहावयास मिळाली. या तालुक्यातील वालुर, कुला कोलदांडी, हातनूर, देगावफाटा, निपाणी टाकळी तसेच पाथरी तालुक्यातील पाटोदा या गावांमध्येही भाजपा-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पद मिळविण्यासाठी एकत्र आले. गंगाखेड तालुक्यातील झोला या गावात मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांचे फोटो स्थानिक पॅनलच्या जाहीरातीत दिसून आले. ग्रा. प. निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढल्या जात असल्या तरी प्रमुख नेत्यांचे राजकारण याच कार्यकर्यांच्या पाठींब्यावर चालते. शिवाय केंद्र व राज्य शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यास सुरुवात केल्याने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी दिग्गज नेतेमंडळींनी चांगलीच ताकद पणाला लावली होती. 
तसेच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा शिवसेना व भाजपामध्ये पराकोटीचा विरोध परंतु, परभणी जिल्ह्यात शिवसेना नेहमीच भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचा आरोप, राष्ट्रवादीने केला केला आहे. विशेषतः जिंतूर बाजार समितीच्या वादात हा विषय चर्चेत आला होता. आता ग्रामपंचायत निवडणुकीत आडगाव बाजार येथे भाजप व शिवसेना कार्यकर्ते एकत्र आल्याचे पहावयास मिळाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही प्रत्यय
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत असेच चित्र पहावयास मिळाले होते. आता पुन्हा ही निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे संकेत मिळत आहेत.
 

Web Title: Separate political fold for Gram Panchayat; Opponents came together, putting aside partisan views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.