येलदरी जलविद्युत केंद्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवसात पाच लाख ४६ हजार युनिट वीज निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:31 PM2021-09-11T17:31:03+5:302021-09-11T17:34:05+5:30
या वर्षी धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने येलदरी धरणाने सप्टेंबर महिन्यात पाणी साठ्याची शंभरी तर गाठलीच परंतू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा करावा लागला.
- विजय चोरडिया
जिंतूर ( परभणी ) : जलविद्युत केंद्राच्या 52 वर्षांच्या इतिहासात एका दिवसांमध्ये सर्वाधिक वीजनिर्मिती करण्याचा उच्चांक 11 सप्टेंबर 2021 रोजी येलदरी जलविद्युत निर्मिती केंद्राने केला आहे. एका दिवसात पाच लाख 46 हजार युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे. याचे बाजार मूल्य 16 लाख 92 हजार रुपये इतके आहे.
सध्या येलदरी धरण 100 टक्के भरलेले आहे. या वर्षी धरण क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने येलदरी धरणाने सप्टेंबर महिन्यात पाणी साठ्याची शंभरी तर गाठलीच परंतू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा करावा लागला. यामुळे वीज निर्मिती केंद्र आणि तेथील कर्मचारी वर्गाला आपली उत्तमोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळाली. 5 लाख 40 हजार स्थापित क्षमता असलेल्या येथील वीज निर्मिती केंद्रात 11 सप्टेंबर रोजी 5 लाख 46 हजार युनिट वीजेची विक्रमी निर्मिती केली. जल विद्युत केंद्राने एक दिवसातील वीज निर्मितीचा दुसऱ्यांदा उच्चांक गाठला आहे. गत वर्षी सप्टेंबर महिण्यात हा उच्यांक स्थापित केला होता, स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी येथील वीज निर्मिती केंद्राने केली आहे. कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.
कमी कर्मचाऱ्यांमध्ये विक्रमी कामगिरी
येलदरी जल विद्युत केंद्रात एकूण मंजूर कर्मचारी 56 आहेत. त्यापैकी केवळ 29 कर्मचारी उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतांनाही येथील कर्मचाऱ्यांनी वीज निर्मितीचा एक विक्रम स्थापित केला आहे. मुंबई येथील नविकर्णीय ऊर्जाचे मुख्य अभियंता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत, कार्यकारी अभियंता बी एम डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यु. एस पाटील यांच्यासह सर्व अभियंता, तंत्रज्ञ, कंत्राटी कामगार यांनी ही कामगिरी केली.
जास्तीच्या बोनस पाण्यावर वीजनिर्मिती
सध्या येथील वीज निर्मिती केंद्र जास्तीच्या येलदरी धरण 100 टक्के भरल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी यावर वीज निर्मिती करत आहे. त्यामुळे येथील वीजनिर्मिती केंद्र बोनस पाण्यापासून राज्याच्या ऊर्जा विभागाच्या तिजोरीत रक्कम जमा करत आहे. विशेष म्हणजे, ही वीजनिर्मिती पावसाळयात धरण भरल्यानंतर धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यापासून तयार करण्यात आल्याने राज्याच्या ऊर्जा विभागाला हे बोनसच मिळाले आहे. धरण शंभर टक्के भरल्याने उर्वरित पाणी पूर्णा नदी पात्रात सोडत असताना ही वीज निर्मिती करण्यात आली.