शॉर्टसर्किटमुळे आग लागून पाच दुकाने जळून खाक; 19 लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 05:50 PM2021-04-10T17:50:13+5:302021-04-10T17:50:37+5:30
सकाळी १० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरातील पार्थ प्रिटिंग या दुकानातून मोठा आवाज आला. त्यानंतर दुकान आगीने वेढले गेले.
बोरी : शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. आगीत जवळपास 19 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सकाळी १० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरातील पार्थ प्रिटिंग या दुकानातून मोठा आवाज आला. त्यानंतर दुकान आगीने वेढले गेले. बघताबघता ही आग आजूबाजूच्या दुकानात पसरली. ग्रामस्थांनी आगीची माहिती पोलिस आणि दुकान मालकांना दिली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. दरम्यान, जिंतूर व परभणी येथील अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आली. पोलीस कर्मचारी बीट जमादार संजय काळे, अनिल शिंदे , खंदारे आदींनी आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
आगीत मुंजा गोरे यांच्या साईराज मशनरीचे अंदाजे १० लाख रुपयांचे, संतोष गायकवाड यांच्या पार्थ प्रिटिंगचे ५ लाख रुपयांचे, संजय कंठाळे यांच्या सलूनचे २ लाख रुपयांचे, बालाजी भुसारे यांच्या सलूनचे दीड लाख रुपयांचे, संतोष जैन यांच्या हॉटेलचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादर अंकुश चौधरी तुपसुंदर हे करत आहेत. या आगीमध्ये नुकसान झालेल्या दुकानदारांनावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी दुकानदारांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.