खळबळजनक ! शेतात गेलेल्या बापलेकीचा मृतदेह आढळला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:50 PM2021-09-13T17:50:18+5:302021-09-13T17:52:24+5:30
शेतातील विहिरीजवळ मोबाईल आणि चप्पल आढळून आले
पालम ( परभणी ) : शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या बापलेकीचा मृतदेह 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता पालम तालुक्यातील गणेशवाडी शिवारात आढळून आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी दिली.
पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील शेतकरी नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय 40 वर्ष) त्यांची मुलगी वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय 14 ) असे मयत यांची नावे आहेत. ते दोघेही 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शेतातील आखाड्यावर बैलांना चारा टाकण्यासाठी गेले होते. ते परतले नसल्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा शेतातील विहिरीजवळ नागनाथ बल्लोरे यांचा मोबाईल आणि चप्पल आढळून आले. विहिरीत पाहणी केली मात्र 60 फूट पाणी असल्याने अंदाज लागत नव्हता. आज पाच मोटारी लावून विहिरीचे पाणी उपसण्यात आले. दरम्यान, दुपारी एक वाजता नागनाथ बल्लोरे व वैष्णवी बल्लोरे यांचा मृतदेह दिसून आला. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आले आहेत. अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद पालम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद साने करत आहेत.
हेही वाचा - कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती
घटनास्थळी रात्री पोलिसांची धाव
गणेशवाडी येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद साने यांनी 12 सप्टेंबर रोजी रात्री घटनास्थळी धाव घेतली होती. ते बराच वेळ घटनास्थळी होते. परंतु विहिरीतील पाण्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप वेळ लागला.
हेही वाचा - आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली