कारची रिक्षाला धडक; महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:19+5:302021-03-06T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मानवत : येथील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ॲपे रिक्षाला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : येथील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ॲपे रिक्षाला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, १० महिला जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३०च्या सुमारास गजानन महाराज मंदिर परिसरात घडली.
पथरी तालुक्यातील बाबूलतार येथील ११ महिला मानवत तालुक्यातील सोमठाणा येथे शेतातील काम करण्यासाठी आल्या होत्या. दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी ६ वाजता या महिला ॲपे रिक्षातून बाबूलतार गावाकडे जात होत्या. वाटेत ही रिक्षा मानवतजवळील गजानन महाराज मंदिर परिसरात उभी होती. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (टीएस १६ ईओ ०८२२) क्रमांकाच्या कारने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात पद्मीनबाई उत्तम शेरकर (६०) यांचा मृत्यू झाला तर सोमिजा रामकिशन गालफाडे (४०), सुमन दादाराव गालफाडे (३८), तुळसाबाई ग्यानू डोंगरे (६०), मालनबाई धायजे (४०), मंदूबाई भदर्गे (४२), राणीबाई भिवजी झाडे (४०), प्रयागबाई साखरे (६०), मीराबाई दशरथ झोडपे (४२), सखूबाई खंडू झोडपे (४४), मालन जनार्धन गालफाडे (५०) या महिला जखमी झाल्या. सर्व जखमी महिलांना उपचारसाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कलीमोद्दीन फारुखी, अशोक ताठे, नारायण सोळंके, खरात आदींनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, अपघात होताच रिक्षाला धडक देणारा कारचालक पळून गेला. पोलीस या कारचा नंबरवरून शोध घेत आहेत.