कोरोनात मृत्यूसह जन्मदारही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:32+5:302021-05-18T04:18:32+5:30
शहरासह जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण सुरवातीला तीन महिने कमी होते. त्यानंतर ...
शहरासह जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण सुरवातीला तीन महिने कमी होते. त्यानंतर आतापर्यंत रुग्णसंख्येची वाढ कायम आहे. सध्या मागील दीड महिन्यापासून लाँकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे विवाह तसेच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असल्याने मंगल कार्यालय किंवा रजिस्टर्ड पध्दतीने होणाऱ्या विवाहावर बंधने आली आहेत. पर्यायाने अनेक जण अगदी मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकून घेत आहेत. यामुळे नोंदणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्यक्षात विवाह सोहळे सुरुच आहेत. त्याचप्रमाणे शहरी भागात कोरोनाने होणारे मृत्यू वाढले आहेत. कोरोनाच्या कालावधीसह २०२० जानेवारी ते एप्रिल २०२१ पर्यंत १२,०८८ बालकांचा जन्म झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
वर्ष जन्म मृत्यू विवाह नोंदणी
२०२० ९४७८ २१४५ ४७८
२०२१ २६१० ७६९ १२४
लग्नांची संख्याही घटली
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लग्नांची संख्या घटल्याचे पहावयास मिळते. यंदाची आणि मागील वर्षीच्या तुळशीच्या लग्नानंतर होणारे अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत. सतत लागणारे लाँकडाऊन आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे निर्बंध पाहता ही संख्या कमी झाली आहे.
जिल्ह्यात नोंदणीकृत ३५ मंगल कार्यालय
शहरासह जिल्ह्यात नोंदणीकृत मंगल कार्यालय ३५ आहेत. या ठिकाणी एका मंगल कार्यालयात लग्न तिथीच्या काळात किमान ८ ते १० लग्न होतात. तर रजिस्टर्ड पध्दतीने महिन्याला ३० ते ४० विवाह होतात. या ठिकाणच्या लग्न कार्यात मोठी घट झाली आहे. यामुळे विवाह नोंदणी घटली आहे. मात्र, जन्मदर वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
चार महिन्यात २६१० जन्म
महापालिकेच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनूसार जानेवारी ते एप्रिल २०२१ मध्ये २६१० बालकांचा जन्म झाला तर ७६९ जणांचा मृत्यू झाला. यात काही मृत्यू नैसर्गिक आणि बाकीचे कोरोनामुळे झाले आहेत. तसेच केवळ १२४ जणांनी विवाह नोंदणी केली आहे.