शंभर कोटींची उलाढाल करणा-या   एमबीए  शेतक-यांची तरूण गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 03:14 PM2020-10-15T15:14:14+5:302020-10-15T15:15:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये  पुण्यातील ‘स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी’चं कौतुक केलं.  तरुण दोस्तांनी एकत्र येऊन सुरूकेलेली हीशेतमाल विक्री कंपनी 100 कोटींच्या उलाढालीर्पयत कशी पोहोचली? 

The young story of an MBA farmer with a turnover of Rs 100 crore | शंभर कोटींची उलाढाल करणा-या   एमबीए  शेतक-यांची तरूण गोष्ट

शंभर कोटींची उलाढाल करणा-या   एमबीए  शेतक-यांची तरूण गोष्ट

googlenewsNext

- हणमंत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अलीकडेच पुण्यातील ‘स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी’चं कौतुक केलं. 
पुण्या-मुंबईतील खुल्या बाजारपेठेत या कंपनीच्या ‘शेतकरी आठवडा बाजारा’च्या संकल्पनेतून 70गावांतील 4500 शेतक-यांना रास्त दर मिळाला.  दीड लाख ग्राहकांना वाजवी भावात ताजा शेतमाल. 750ग्रामीण तरुणांच्या हाताला काम तर मिळालंच; पण वार्षिक उलाढाल 1क्क् कोटीर्पयत पोहोचली.
हे असं ठळक दिसावं असं यश या कंपनीला कसं मिळालं? कोण त्याचे कर्तेधर्ते?
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेगावचा नरेंद्र पवार हा तरुण. बीकॉम झाला, एमबीएला प्रवेश घेऊन त्यानं मार्केटिगंचे धडेही गिरविले. आपण नोकरी करायची नाही, शेतमालाचं मार्केटिंग करायचं हे त्यानं पक्कं ठरवलं होतं.


एमबीए करत असतानाच त्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचा अभ्यास सुरू केला. 
शेतकरी आपलं उत्पादन बाजार समितीत कवडीमोलाने विकतात. शेतमाल वगळता इतर सर्व वस्तूंचा उत्पादक हा त्याच्या मालाची विक्री किंमत ठरवितो, मग हे स्वातंत्र्य शेतक-यालाही का मिळू नये, असा त्याला प्रश्न पडला. त्यातून त्यानं ठरवलं की आपण शेतकरी उत्पादक समूहगटाच्या माध्यमातून ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ शेतमाल विक्री करू. त्याच्या सोबत होते त्याचे चार मित्र गणेश, तुषार, ऋतुराज व राजेश, त्यांनीही एमबीए केलं होतं.
या सा-या मित्रांनी शेतमाल विक्री आणि मार्केटिंगचे प्रयोग करायचे ठरवले.
पुणे, सातारा व नगर या तीन जिल्ह्यांतील शेतक-यांचे उत्पादक गट स्थापन केले. प्रत्येक भागाची, तालुक्याची व जिल्ह्याची विशिष्ट शेतमालासाठी ओळख असते. त्यानुसार पुरंदर तालुक्यातून वाटाणा, पावटा, अंजीर-सीताफळ आणायचे.  जुन्नर भागातून कोबी, फ्लॉवर व पालेभाज्या घ्यायच्या, भोर तालुक्यातून भोपळा, कारली, गिलकी या वेलवर्गीय भाज्या, तर महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरी असं त्यांनी ठरवलं.
पालेभाज्या, फळांच्या प्रकारानुसार 70गावांतून 160शेतकरी उत्पादक गट स्थापन झाले. गावांतच संकलन सेंटर्सही उभारण्यात आली.
अगोदर भाडय़ाने त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गटांनी मिळून 225 पिकअप (छोटे टॅम्पो) हप्त्याने विकत घेतले. 
सुरुवातीला पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये आठवडय़ातून दोन ते तीन दिवस शेतमालाची गाडी नेऊन थेट विक्री सुरू केली. मात्र, थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री होत असली तरी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन विकण्यास मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे एखाद्या सोसायटीत जाण्याऐवजी त्याच परिसरातील एखाद्या सार्वजनिक जागेवर शेतकरी आठवडा बाजार भरविण्याची संकल्पना पुढे आली. परंतु, तेव्हा शासनाचं धोरण नसल्यानं शेतकरी आठवडा बाजार भरविण्यासाठी अनेक अडचणी येऊ लागल्या. तरीही स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीने जिद्द सोडली नाही. 
कोथरूडमधील गांधी भवन येथील जागा जून 2014 ला शेतकरी आठवडा बाजारासाठी युक्रांदच्या कुमार सप्तर्षीनी दिली. पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पणन विभागाच्या सुकाणू समितीवर असल्याने नरेंद्र पवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै 2016 ला शेतमाल नियमनमुक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रलयाच्या आवारात 14 ऑगस्ट 2016 ला संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजार लाँच करण्यात आला. 
पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली. एका आठवडे बाजारात शेतक:यांचे साधारण 40 विक्री स्टॉल आणि आठवडय़ातील सहा दिवस विविध ठिकाणी बाजार भरविण्याचं ठरलं.
 पुणे व मुंबई या दोन शहरांत प्रत्येकी 12 असे 24 आठवडे बाजार स्वामी समर्थ शेतकरी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. शेतक-यांना रास्त भाव आणि ग्राहकांना वाजवी दरात ताजा शेतमाल मिळू लागला. त्यामुळे आठवडे बाजाराला ग्राहकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून स्थानिक नगरसेवक, आमदार व खासदार यांच्याकडूनही आठवडे बाजार भरविण्यासाठी सहकार्य मिळाले. 
शासनाचे आठवडे बाजाराचे धोरण आल्यानंतर स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीने पुणे, सातारा व नगर या तीन जिल्ह्यांत 160 शेतकरी उत्पादक गट स्थापन केले. प्रत्येक गटात किमान 10 याप्रमाणे 16 ते 18 उत्पादक व विक्री गटांनी आठवडे बाजार भरविण्यास सुरुवात केली. त्यासाठी सर्व गटांना ड्रेसकोड, हातमोजे, व्यसन करायचे नाही, अशी शिस्त घालून दिली. स्वच्छता, प्रतवारी व पारदर्शकतेसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा अशी नियमावली करण्यात आली. बाजार समितीत शेतमालाला मिळणारा होलसेल भाव आणि किरकोळ बाजारातील भाव यांचा मध्य साधत दर आठवडय़ाला शेतमालाचे वाजवी दर निश्चित केले जातात. 
-------------------------------------------------------

आता बाजारात ‘विकेल ते पिकविण्या’ऐवढी शेतक-यांची शिकलेली मुले हुशार झाली आहेत. 
शेतमालाची काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक व मार्केटिंग अशी गाडीतील इंधन वगळता सर्व कामं ग्रामीण भागातील तरुणांना मिळत आहेत. 
आठवडे बाजारातील थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीमुळे शहरातील पैसा ग्रामीण भागात सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात येईल. त्यामुळे आठवडे बाजाराची साखळी केवळ पुणे व मुंबईपुरती मर्यादित न ठेवता, देशभर व आंतरराष्ट्रीय बाजार्पयत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- नरेंद्र पवार, 
अध्यक्ष, स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी, पुणे . 


(लेखक लोकमतच्या  पिंपरी-चिंचवड आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

patil.hanmant@gmail.com

Web Title: The young story of an MBA farmer with a turnover of Rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.