world enviornment day : प्रश्न एवढाच आहे की, आपण मातीत हात घालणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:28 PM2020-06-04T18:28:38+5:302020-06-04T18:35:32+5:30

कोरोनाने माणसांना धडा शिकवला, निसर्गाने माणसांना अद्दल घडवली आता कळेल, निसर्गाची किंमत असं सगळं बोलून झालं असेल तर सांगा, तुम्ही मातीत हात कधी घालणार? जागा नाही, हे कारण सांगू नका, अगदी फुटक्या माठात, प्लॅस्टिकच्या डब्यातही दोन रोपं रुजू शकतात.

world environment day: time for nature- let's grow something. | world enviornment day : प्रश्न एवढाच आहे की, आपण मातीत हात घालणार का?

world enviornment day : प्रश्न एवढाच आहे की, आपण मातीत हात घालणार का?

Next
ठळक मुद्देघाला चिखलात हात.

- प्राची पाठक

झाडं लावा, झाडं जगवा. या घोषणा आता कुणाला माहिती नाही? पण या नुसत्या घोषणा किती काळ वाचायच्या? निसर्ग वाचवा हे किती काळ नुसतंच बोलायचं?  झाडं नेमकी कोणी लावायची?  कुठं फुलवायचा निसर्ग? कोणी फुलवायचा हा निसर्ग? ग्लोबल वॉर्मिंगच्या नुसत्या गप्पा मारायच्या? 
किती ऊन पडलंय, किती घाम येतोय असा वैताग करायचा. आता हा कोरोना आला तो माणसांच्याच चुकांमुळे वगैरे म्हणत राहाचंय. कोरोनासारख्या इतक्या छोटय़ा विषाणूने आणि म्हणूनच निसर्गाने कशी माणसाला अद्दल घडवली अशा जोरदार गप्पा ठोकायच्या.
पण मग म्हणजे आपलं पर्यावरण प्रेम हे केवळ निबंध लिहिण्यापुरतं, चमकदार गप्पा, पल्लेदार भाषणं ठोकण्यापुरतंच ठेवायचं का? 
आपण स्वत: कधी मातीत उतरणार? आपले हातसुद्धा कधीतरी मातीत घालून बघावं असं नाही का वाटतं?
शहरातले अनेकजण म्हणतील आमच्याकडे ना शेती, ना माती. घर तीन खोल्यांचं, त्याला ना अंगण, ना बाल्कनी. वाटलं तरी नाहीच आम्ही मातीत हात घालू शकत? आम्हाला काय सांगता झाडं लावायला?
बरं हे प्रश्न क्षणभर मान्य केले तरी सांगा, आपल्या बाल्कनीतून दिसणारी किती झाडं आपल्याला ओळखता येतात? किती फुलांची माहिती आपल्याला असते? त्यांच्यावर येणारे किती पक्षी, किती कीटक आपण ओळखू शकतो? 
आपण खातो त्या किती भाज्या, किती फळं कसे उगवतात, त्यांची शेती कशी करतात हे तरी आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का?
आणि जे करतात ते तरी काय करतात?
अनेकदा वृक्ष लागवड या नावाखाली  सोसायटीत, अंगणात वृक्ष प्रेमाच्या नावाखाली कुठेही आणि कशीही झाडं लावून ठेवतात. तशी झाडं  लावणं,  जागा अडवणं, अंधारे, कोंदट आडोसे तयार करणं म्हणजे वृक्ष प्रेम का? 
अगदी रस्त्यावरसुद्धा आपली घराची, सोसायटीची हद्द मार्क करायची म्हणून इतरांना त्नास होईल अशा पद्धतीने झाडं लावणं म्हणजे वृक्ष प्रेम का? 
पुन्हा सोय म्हणून जरा कुणी झाडाच्या फांद्या छाटल्या तरी लगेच वृक्ष तोडले म्हणून रडरड करणारे अनेकजण असतात.
खरं तर आपण झाडाफुलांविषयी, आजूबाजूच्या निसर्गाविषयी जरा सजग झालो, तर झाडं छाटणं म्हणजे झाडं तोडणं नव्हे, हे आपल्याला कळेल. 
कुठे, कशी, कोणती झाडं लावावीत, हे आपल्या लक्षात येईल. त्यातली देशी झाडं कोणती, विदेशी कोणती, त्यांचं निसर्गातलं स्थान काय, ते आपल्याला कळेल. 
स्थानिक झाडांची मजा समजून घेता येईल. 
पण हे सगळं केव्हा होईल? जेव्हा तुम्ही स्वत: मातीत उतराल तेव्हा.
बागकाम हे काम नाही, त्याकडे आनंद, कला अगदी एक व्यायाम प्रकार म्हणूनसुद्धा बघता येईल. या व्यायामातून केवळ कॅलरीज जळणार नाहीत,  तर काही तरी सुंदर घडवतादेखील येईल. निसर्गाची गोडी लागेल. 
आज बी लावलं आणि उद्या फळ मिळालं, असं झट की पट निसर्गात काहीच घडत नसतं. यातून आपण संयम शिकू शकू. निसर्गातील अन्नसाखळी परीक्षेपुरती पाठ करायची गरज उरणार नाही.
 आजूबाजूच्या परिसराविषयी आपण अधिक सजग होऊ.
आपल्याकडे थोडं फार अंगण असेल, तर उत्तमच. आपण अधिक चांगल्या प्रकारे तिथे बागकामाचा छंद जोपासू शकतो. 
पण आता आला पावसाळा म्हणून लगेच बाग फुलवायला नर्सरीत जाऊन भसाभस रोपं विकत आणायची गरज नाही. नर्सरीतून रोपं आणून, त्यावर रासायनिक फवारणी करून बाग तयार करण्याचं काम कोणीही करू शकतं. त्यात फार काही विशेष स्किल नाही. तशी बाग किती काळ तगेल, याची खात्नी नाही. 
आपल्याला नेमकी कोणती झाडं का हवी आहेत, आपली जागा किती आहे याचा आधी विचार करायचा. तिथे केवळ झाडांचं गचपण करून ठेवण्यापेक्षा, कमी जागेत एकात एक खूप झाडं वेडीवाकडी लावून ठेवण्यापेक्षा आपण त्या झाडांची प्रकृती समजून घेऊन त्यानुसार बागकाम करायला शिकू. 
झाडं लावताना तिथेही ठरावीक अंतर पाळून मगच ती लावावीत, हे आपल्याला कळेल. सर्वच मोकळ्या जागेत वाटेल तशी झाडं लावून ठेवायची नसतात. जागा मोकळी सोडणंदेखील तितकंच महत्त्वाचं असतं बागकामात. कारण, पावसाळ्यात झाडं वेडीवाकडी वाढतात. अनेक जीव त्याच्या आजूबाजूला येतात. आडोश्यात लपणारे काही जीव घातक असू शकतात. आपल्या सर्व परिसरात मोकळा सूर्यप्रकाश पोहोचणं तितकंच आवश्यक आहे, हे आपल्याला कळेल. झाडांच्या अंधा:या गचपणापेक्षा मोकळीढाकळी, हवेशीर, प्रकाशमान बाग फुलवणो एक वेगळीच कला आहे. असलेलं अंगण किंवा बाल्कनी झाडांनी पूर्ण भरून ठेवणं, झाकोळून टाकणं  यात काही मजा नाही. 
तर आपल्याकडे अगदी लहान जागा, अगदी बाल्कनी, खिडकीतला एखादा कोपरा जरी असेल तरी आपण ही आपली बागकामाची हौस भागवू शकतो.
त्यासाठी जरा अधिक उत्साहानं या जगाकडे बघावं मात्र लागेल..

यंदा पावसाळ्यात हे करून पाहता येईल.

* आपल्याला ज्या भाज्या आवडतात, जी फळं आवडतात, त्यांची बाजारपेठ कोणती? कुठून येतात ती झाडं-फुलं-फळं? हे आपण शोधू शकतो. कितीतरी ऑनलाइन सपोर्ट ग्रुप्स असतात, ते जॉइन करू शकतो. 
ही फळं, भाज्या, फुलं आपल्याला आपल्या उपलब्ध जागेत कशी आणि कुठे लावता येतील, याची माहिती घेऊ शकतो. 
* उरला प्रश्न ही झाडं कशात लावायची? त्यांची माती कुठून आणायची? सुरुवातीला लगेच उठून बाजारात जाऊन डझनभर कुंडय़ा विकत आणायची काहीच गरज नाही. आपल्या घरातले जुने, गळके माठ, जुन्या बादल्या, तेलाचे, श्रीखंडाचे, आइस्क्र ीमचे लहान-मोठे डबे आपण कुंडीसारखे वापरला शिकू शकतो. त्यासाठी हे नाही, ते नाही करत अडून बसावं लागत नाही. मग आपल्या अंगणातच असलेली जशी असेल तशी माती आपण वापरून बघू शकतो. त्यातून मातीचा पोत आपल्याला कळू लागेल. 
* कुंडी कशी भरायची ते आपण शिकू. त्यासंदर्भात बरीच माहिती इंटरनेटवर मिळेल, अगदी मातीची शेती करण्यार्पयतचे प्रयोग सापडतील. त्यातलं अगदी सोपं निवडून काही दिवस सलग तरी करून पाहाता येईल.

* आपण खातो, त्या भाज्यांमधूनच काही बी मिळतं का, ते आपण बघू शकतो. कारले, गिलके, टोमॅटो, वांगी, भेंडी, शेवगा, वगैरे यांची रोपं घरीच बनवायला शिकू शकतो. काय पेरलं तर कोथिंबीर येते, हे समजून घेऊ शकतो. स्वयंपाक घरात लागणा:या काही गोष्टी जसं की कढीपत्ता, लिंब, गवती चहा, अडुळसा, पुदिना, तुळस हे आपण लावून बघू शकतो. 
* कोणतीही रोपं विकत न आणता आपल्या परिसरात कोणाकडे रोपं असतील, तर ती मागून घेता येतील. पुदिन्याची एखादी काडीसुद्धा सहज लागून जाते. कढीपत्त्याच्या झाडाखाली इतर भरपूर लहान रोपं असतात जी सतत कमी करावी लागतात. त्यातून एखादं रोप आपल्याला सहज मिळून जाईल. काही झाडांच्या केवळ काडय़ासुद्धा लागून जातात. ती आपल्याला आणता येतील. 
* झाडं आणि झुडपं यातला फरक कळू लागेल. घराजवळ, दाटीवाटीच्या ठिकाणी मोठाली झाडं लावून घराला नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा तिथे नीट आकार देता येणारी, आटोक्यात राहणारी लहान झुडुपं लावणं योग्य, हे कळू लागेल. 
* हे सारं थोडय़ा श्रमात जमेल, स्क्रीन टाइम कमी होऊन ख:या सृजनशीलतेला आनंद मिळेल. किती सुंदर फळ आपल्या कष्टाला येतं, हे अनुभवता येईल. व्हॅलेण्टाइन्स डेला एखादं गुलाबाचं फूल विकत घेऊन देणं सोपं; पण एक गुलाबाचं झाड वाढवण्यातलं, त्याला फुलं बहरण्याचं पाहून होणारा आनंदही आपण अनुभवून पाहू.
* हे सारं करून न पाहता त्याची गोडी कळत नाही. केवळ तोंड देखलं निसर्ग प्रेम व्यक्त करण्यापेक्षा या पर्यावरण दिनापासून मातीत हात घालू. आपापली बाग फुलवायला शिकू या. आपला हिरवा कोपरा आपणच घडवू, तो लहान अगदी दोन रिकाम्या प्लॅस्टिक डब्यांचा असेल. पण तो असेल. असावा म्हणून तरी प्रयत्न करू.. 


(प्राची मानसशास्त्रासह  पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)

Web Title: world environment day: time for nature- let's grow something.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.