राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:31 AM2019-05-02T03:31:08+5:302019-05-02T03:31:43+5:30

विरोधात कौल देण्याची परंपरा : मतदारांमध्ये नाराजी

Uncertainty in Congress due to increased percentage of votes in Rajasthan | राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Next

सुहास शेलार

जयपूर : ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा नारा देत राजस्थानी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणले. काँग्रेसने मोठमोठी आश्वासने देत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, विधानसभा निवडणुकी वेळी जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता न झाल्याने शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानाचा वाढलेला टक्काही काँग्रेसची धाकधूक वाढविणारा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा राहिली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. कालांतराने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकºयांना सत्तेत येताच १० दिवसांत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सहा महिने उलटूनही पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात रोष आहे. शिवाय शिक्षण, बेरोजगारी, आरक्षणप्रश्नी काँग्रेसने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे.

सत्तेत आल्यापासून गहलोत सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय गहलोत निर्णय घेऊ शकत नाहीत, असा संदेश सोशल मीडियावर फिरल्याने भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी गांधी-गहलोत-पायलट यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या सोशल सेलने निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले. शिवाय पक्षाच्या मधल्या फळीने तळागळात जाऊन प्रचार केला. पहिल्या टप्प्यातील मतदाना वेळीही भाजपचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढणे ही भाजपसाठी जमेची बाजू असल्याचे विश्लेषक सांगतात.

वसुंधरा राजेंना ठेवले प्रचारापासून दूर
विधानसभा निवडणुकी वेळी ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा उघड नारा मतदारांनी दिला होता. त्यामुळे मोदींविषयी असलेले सर्वसामान्यांचे ‘मत’परिवर्तन होऊ नये म्हणून भाजपने खबरदारी घेतली आहे. वसुंधरा राजे कमीत कमी प्रचारसभांमध्ये कशा दिसतील, याची रणनीती अमित शहांनी आखल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदारांनी रचला इतिहास
२९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी राजस्थानी मतदारांनी विक्रमी मतदान करीत इतिहास रचला. १३ जागांसाठी सोमवारी ६८.२२ टक्के मतदान झाले. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासूनची ही राजस्थानातील सर्वाधिक टक्केवारी आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असतानाच, मतदारांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असल्याचे विश्लेषक सांगतात.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघ
दुसऱ्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, नागौर, दौसा या मतदारसंघांचा समावेश आहे.

Web Title: Uncertainty in Congress due to increased percentage of votes in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.