पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:56 PM2019-08-08T14:56:04+5:302019-08-08T14:57:40+5:30

'पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?'

Twitter Must Clarify hashtag trending, Is twitter backing anti national, pro pakistan elements | पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

Next
ठळक मुद्देआयएसआय पुरस्कृत सायबर आर्मी ट्विटरवर खोट्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करून काश्मिरींना भडकवत आहे.#TwitterMustClarify या हॅशटॅगवरून तमाम देशप्रेमी नेटकऱ्यांनी ट्विटरवर निशाणा साधलाय.पाकधार्जिण्या सायबर आर्मीला ट्विटरवरून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था - आयएसआय पुरस्कृत सायबर आर्मी उघडपणे, ट्विटरसारख्या जबाबदार माध्यमावर खोट्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करून काश्मिरी जनतेला भारताविरोधात भडकवण्याचं काम करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कलम 370 मधील वादग्रस्त कलमं रद्द करण्याची आणि जम्मू-काश्मीरच्या विभाजनाची घोषणा झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. या गोंधळलेल्या जनतेचं शंकानिरसन करण्याची ग्वाहीही केंद्र सरकारने दिली आहे. पण त्याआधीच, भारतीयच काश्मिरींचे कसे शत्रू आहेत, असं भासवण्यासाठी काही पाकधार्जिण्या ट्विटर हँडलवरून रिपब्लिक वृत्तवाहिनीचे जुने व्हिडीओ छेडछाड करून पोस्ट केले जात आहेत. या धोकादायक प्रकाराची तात्काळ दखल घेत या इंग्रजी वृत्तवाहिनीने 'ट्विटर इंडिया'ला जाब विचारला आहे. #TwitterMustClarify या हॅशटॅगवरून तमाम देशप्रेमी नेटकऱ्यांनी ट्विटरवर निशाणा साधलाय असून पाकधार्जिण्या सायबर आर्मीला ट्विटरवरून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.

जम्मू-काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा हटवण्यात आल्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत केली. अनेक वर्षं चर्चेत असलेल्या कलम ३७० मधील वादग्रस्त तरतुदी रद्द करण्यात आल्या आणि जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचं विधेयकही संसदेत मंजूर झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ७ ऑगस्टला 'with kashmir' या हँडलवरून इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करण्यात आली. ही स्टोरी ट्विटमध्येही होती. 'Now Operation Elimination starts. We will have to eliminate these people. As a proud Indian, I am prepared for collateral damage', असं अर्णब गोस्वामी आपल्या डिबेट शोमध्ये बोलत असल्याचा व्हिडीओ दाखवण्यात येत होता. 'आता ह्यांना संपवण्याची धडक कारवाई सुरू व्हायला हवी, त्यात आपलं काही नुकसान झालं तरी बेहत्तर', अशा आशयाचं हे विधान काश्मिरींबाबत आहे आणि हीच भारतीयांच्या मनातील सूप्त इच्छा आहे, असं भासवून काश्मिरींची सहानुभूती मिळवण्याचं हे कारस्थान होतं. मुळात, हा व्हिडीओ ३७० कलम हटवल्यानंतरचा नव्हताच आणि त्यातलं शेवटचं वाक्य हटवून अर्थाचा अनर्थ करण्याची खेळी देशविरोधी गटांनी केली होती. 

वास्तविक, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर वृत्तवाहिनीवर २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या चर्चेचा हा व्हिडीओ आहे. त्यात अर्णब यांनी स्पष्ट म्हटलंय की, दगडफेक करणारी गँग, फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पावलं उचलायला हवीत. परंतु, तेच पाकधार्जिण्यांनी वगळलं आणि काश्मिरी जनतेला चिथावण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या अपप्रचाराविरोधात #TwitterMustClarify हा हॅशटॅग तयार करून रिपब्लिक वाहिनी आणि देशप्रेमी नेटकऱ्यांनी ट्विटरला घेरलं. 

भारताविरोधात गरळ ओळणाऱ्या, पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या, आयएसआय पुरस्कृत सायबर आर्मीच्या ट्विटर हँडल हटवली का जात नाहीत, ट्विटर त्यांना पाठीशी घालतंय का?, या पाकधार्जिण्या लोकांचे देशविरोधी हॅशटॅग भारतात ट्रेंड होऊच कसे शकतात?, असा प्रश्नांचा भडिमार नेटकऱ्यांनी केला आहे. त्यांना ट्विटर इंडियाकडून ठोस उत्तर हवंय, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशाराही काही जणांनी दिला आहे.    

या चर्चेदरम्यान @ZaidZamanHamid हे ट्विटर हँडल चर्चेत आलं आहे. हा माणूस आयएसआयचाच हस्तक असून तो काश्मिरी जनतेमध्ये भारताबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जातोय. त्याची काही ट्विट पाहिली तर त्यातून त्याच्या भारतद्वेषाची कल्पना येऊ शकते. अशा माणसाचं अकाउंट ट्विटर व्हेरिफाईड (नावापुढे ब्लू टिक)असूच कसं शकतं?, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय.

एवढं सगळं होत असतानाही, ट्विटर इंडियाने चकार शब्द काढलेला नाही. एक जबाबदार समाजमाध्यम म्हणून अशा पद्धतीच्या समाजविघातक तत्त्वांना त्यांनी अजिबात थारा देता कामा नये. ही माणसं फेक फोटो, व्हिडीओ पसरवून देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचवत आहेत. त्यामुळे भारतीय नेटिझन्समध्ये तीव्र नाराजी, संताप आहे. फेसबुकने अशी अनेक अकाउंट्स, फेक अकाउंट्स बंद केली आहेत. खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठीही ते अनेक उपाययोजना करताना दिसताहेत. ट्विटरनेही जनभावनांची दखल न घेतल्यास नेटकरी त्यांना 'जोर का झटका' देऊ शकतात. 

Web Title: Twitter Must Clarify hashtag trending, Is twitter backing anti national, pro pakistan elements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.