“लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, रश्मी ठाकरेंना कैदेत टाकल्यावर…”; नवनीत राणांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 01:16 PM2022-05-15T13:16:36+5:302022-05-15T13:17:22+5:30

काश्मिरमध्ये हनुमान चालिसा म्हणू शकते तर महाराष्ट्रात का नाही, शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

mp navneet rana slams shiv sena chief cm uddhav thackeray after bkc sabha | “लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, रश्मी ठाकरेंना कैदेत टाकल्यावर…”; नवनीत राणांचा घणाघात

“लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा, रश्मी ठाकरेंना कैदेत टाकल्यावर…”; नवनीत राणांचा घणाघात

googlenewsNext

नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत मुंबईतील बीकेसी मैदानावर भव्य सभा घेतली. यावेळी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर भाजप नेत्यांनीही पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. मात्र, यातच आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले, तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली. 

नवनीत राणा दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. याला आता नवनीत राणा यांनी दिले आहे.

तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे, जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल, या शब्दांत नवनीत राणा यांनी आपली सल बोलून दाखवली. तसेच मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राणा यांनी केली. 

काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? 

मला म्हणाले हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते. तुम्ही पुरुष आहात, माझ्यापेक्षा महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. पण तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केलात. हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का?, असा रोखठोक सवाल नवनीत राणा यांनी केला.
 

Web Title: mp navneet rana slams shiv sena chief cm uddhav thackeray after bkc sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.