Atal Bihari Vajpayee : वाजपेयींबद्दलच्या 'या' 10 दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:44 AM2019-08-16T10:44:10+5:302019-08-16T11:09:17+5:30

भारतीय राजकारणातील खंबीर व लोकप्रिय नेता अशी वाजपेयी यांची ओळख होती. त्यांच्याविषयीच्या 10 दुर्मिळ गोष्टी जाणून घेऊया.

Atal Bihari Vajpayee first death anniversary Atal Bihari Vajpayee 'a rare thing in Indian politics' | Atal Bihari Vajpayee : वाजपेयींबद्दलच्या 'या' 10 दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत का? 

Atal Bihari Vajpayee : वाजपेयींबद्दलच्या 'या' 10 दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत का? 

Next

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. वाजपेयींच्या 'सदैव अटल' स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. भारतीय राजकारणातील खंबीर व लोकप्रिय नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जादूई नेतृत्त्वामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते विशेष लोकप्रिय होते. राजकारणाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. त्यांच्याविषयीच्या 10 दुर्मिळ गोष्टी जाणून घेऊया.

आग्रा कनेक्शन 

आग्रा येथील बटेश्वर हे गाव वाजपेयी कुटुंबीयांचे मूळ गाव होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे आजोबा पंडित श्याम लाल वाजपेयी यांनी बटेश्वरमधून मध्य प्रदेशातील मोरेना येथे स्थलांतर केले होते. 

शाळेतील हुशार विद्यार्थी

शालेय जीवनात अटल बिहारी वाजपेयी अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी राज्यशास्त्र विषयात प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवी मिळवली होती. हिंदी, संस्कृत व इंग्रजी विषयातही त्यांनी विशेत प्रावीण्य मिळवले  होते.

सार्वजनिक जीवनातील पहिला सक्रीय सहभाग

ग्वाल्हेरच्या आर्य कुमार सभा या संघटनेच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.

डाव्या विचारांकडे वाजपेयी झाले होते आकर्षित  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी काहीसे कम्युनिस्ट विचारसरणीकडे झुकलेले होते. मात्र, बाबासाहेब आपटे यांच्या सांगण्यावरून त्यांनी 1939 साली संघात प्रवेश केला. त्यानंतर 1947 साली ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. 

वाजपेयींना पहिली अटक कधी झाली

1942 साली ब्रिटीश सरकारविरुद्धच्या छोडो भारत चळवळीच्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रेम यांना अटक करण्यात आली होती. त्यांना 23 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. 

वाजपेयी आणि त्यांचे वडील शिकायचे एकाच वर्गात

अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी कानपूरच्या डीएव्ही महाविद्यालयात एकत्रच कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर ते वसतिगृहावरही एकत्रच राहायचे.

पत्रकारितेशी संबंध

अटल बिहारी वाजपेयींनी पत्रकारितेचे प्रचंड आकर्षण होते. पत्रकार होणे हे त्यांचे स्वप्नही होते. पक्षाचे काम करत असतानाच त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पक्षाकडून त्यांना सुरुवातीच्या काळात उत्तर प्रदेशातील दीनदयाळ उपाध्याय दैनिकाच्या 'राष्ट्रधर्म' या मासिकाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय, संघाच्या 'पांचजन्य' तसेच 'वीर अर्जून' व 'स्वदेश' या दैनिकांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. 

वाजपेयींविषयी नेहरुंनी वर्तविलेले भाकीत

देशात 1957 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वाजपेयी उत्तर प्रदेशच्या बलरामपूर मतदारसंघातून विजयी झाले. संसदेतील त्यांच्या पहिल्याच भाषणाने अनेकांना प्रभावित केले. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अटलबिहारी वाजपेयी एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तविले होते. 

मला, नेहरुंचे ते पेटिंग परत पाहिजे

अटल बिहारी वाजपेयी 1977 साली मोरारजी देसाई सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री झाले. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या साऊथ ब्लॉकमधील कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एक पेटिंग हरवले होते. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी, मला कोणत्याही परिस्थितीत ते पेंटिंग परत पाहिजे, असे कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले होते. 

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारा पहिला नेता

अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदी भाषेला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे ते पहिली व्यक्ती होते.

 

Web Title: Atal Bihari Vajpayee first death anniversary Atal Bihari Vajpayee 'a rare thing in Indian politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.