पंधरा वर्षांनंतर संपुष्टात येणार ‘महिलाराज’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 08:34 PM2021-01-20T20:34:30+5:302021-01-21T01:28:00+5:30

शैलेश कर्पे सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, यावेळी सरपंचपद ह्यसर्वसाधारणह्ण होण्याची शक्यता असल्याने १५ वर्षांनंतर या खुर्चीवर पुरुषाला बसण्याचा योग येणार आहे.

Will 'Mahila Raj' come to an end after 15 years? | पंधरा वर्षांनंतर संपुष्टात येणार ‘महिलाराज’?

पंधरा वर्षांनंतर संपुष्टात येणार ‘महिलाराज’?

googlenewsNext
ठळक मुद्देवडांगळी : सरपंचपद सर्वसाधारण होण्याची शक्यता , नाव निश्चितीसाठी पॅनलप्रमुखांची लागणार कसोटी

जावयाची धिंड व सतीमाता-सामंतदादा यामुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या वडांगळी ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक यंदा चांगलीच गाजली. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक व शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने ग्रामविकास पॅनलची निर्मिती केली होती. सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे यांचे पती व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे व पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. त्यात सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने बाजी मारत सर्वच्या सर्व ९ जागांवर विजय मिळविला. यापूर्वी ग्रामविकास पॅनलच्या २ जागा बिनविरोध निवडून आल्याने ग्रामविकास पॅनलची निर्विवाद सत्ता आली आहे.
ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची निर्विवाद सत्ता आल्याने सरपंचपदासाठी विरोधी गटाकडून कोणतीही रस्सीखेच नाही. १५ वर्षे सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी राहिल्याने यावेळेचे आरक्षण सर्वसाधारण असणार अशी शक्यता आहे. त्यामुळे सरपंचपदाची खुर्ची कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सुदेश खुळे, माजी सरपंच शिवाजी खुुळे, पांडुरंग खुळे, गणेश कडवे या ग्रामविकास पॅनलच्या नेत्यांची सरपंचपदाचे नाव निश्चित करताना कसोटी लागणार आहे.
गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा विचार केल्यावर पुरुषाला पंधरा वर्षांत सरपंचपदाची खुर्ची मिळाली नाही. २००५-१० या सालासाठी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. अनुसूचित जातीचा पुरुष या निवडणुकीत विजयी झाला नसल्याने मंदा अढांगळे या महिलेला पाच वर्षे सरपंचपद भूषविण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर, २०१०-१५ या काळात सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी जाहीर झाले होते. या पाच वर्षांच्या काळात छाया पवार यांना पाच वर्षे सरपंचपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे २०१५-२० या सालासाठी सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग(ओबीसी)च्या महिलेसाठी निघाले होते. या काळात सुनिता सैंद व सुवर्णा कांदळकर या दोघा महिलांना अडीच-अडीच वर्षे सरपंचपदाची खुर्ची मिळाली होती. त्यामुळे २००५ पासून पुरुषांना सरपंचपदाने हुलकावणी दिली आहे. १५ वर्षे सरपंचपदाचा महिलाराज लोटल्यानंतर, यावेळी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघेल, असा अंदाज आहे किंवा नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण निघू शकते. मात्र, गेल्या वेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला सरपंच होऊन गेल्याने सरपंचपद सर्वसाधारण होण्याची दाट शक्यता आहे.
१५ वर्षांत चार महिला सरपंच
वडांगळी ग्रामपंचायतीत २००५ पासून महिला सरपंच आहे. १५ वर्षांत मंदा अढांगळे व छाया पवार यांना प्रत्येकी पाच वर्षे गावचा कारभार करण्याची संधी मिळाली. त्यानंतर, सुनिता सैंद व सुवर्णा कांदळकर या महिलांनी प्रत्येकी अडीच वर्षे गावगाडा सांभाळला. १५ वर्षांत चार महिलांना सरपंचपद मिळाले. यावेळी महिला सरपंचपद जाऊन पुरुषांना संधी मिळणार असल्याने, सरपंचपदाचे महिलाराज संपुष्टात येण्याची आहे.
सरपंचपदासाठी यांची चर्चा
सरपंचपद सर्वसाधारण होण्याची शक्यता असल्याने व १५ वर्षांत पुरुषांना संधी न मिळाल्याने, यावेळी पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. वडांगळी ग्रामपंचायतीत ११ जागा आहेत. त्यापैकी ६ महिला तर ५ पुरुष आहेत. या पाच पुरुषांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा पुरुष आहे. त्यामुळे उर्वरित तीन सदस्यांमध्ये सरपंचपदाची खुुर्ची मिळण्याची शक्यता आहे. माजी उपसरपंच व गेल्या पाच वर्षांचा ग्रामपंचायत कामाचा अनुभव असलेले नानासाहेब खुळे सरपंचपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबरच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांना पराभूत करून जायंट किलर झालेले योगेश घोटेकर हेही सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत, तर ओबीसी जागेवर विजयी झालेले राहुल खुळे यांनाही सरपंचपदाची संधी मिळू शकते. सध्या तरी ग्रामविकास पॅनलकडून या तीन तरुणांची सरपंचपदाच्या नावासाठी चर्चा आहे. सरपंच आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी असून, त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Web Title: Will 'Mahila Raj' come to an end after 15 years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.