नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मतदारांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 12:02 AM2022-01-23T00:02:01+5:302022-01-23T00:18:29+5:30

६ नगर पंचायतींचा निकाल हा उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राजकीय पक्षांना दिशा दाखविणारा आणि मतदारांचा कौल कोणाला आहे, हे स्पष्ट करणारा आहे. एकूण १०२ जागा असताना मतदारांनी प्रमुख तीन पक्षांना समप्रमाणात त्या विभागून दिल्या आहेत. भाजपला ३०, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला २८ तर शिवसेनेला २५ जागा दिल्या आहेत. राज्यात सत्ता आहे, म्हणून महाविकास आघाडीला कौल दिला असेदेखील म्हणता येत नाही, कारण निफाड, सुरगाण्यासारख्या ठिकाणी आघाडीतील पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले असेदेखील नाही. देवळ्यात केदा आहेर आणि सुरगाण्यात हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कामगिरीला पावती मिळाली आहे. पेठपाठोपाठ सुरगाणा हा माकपचा किल्ला ढासळला आहे. मनसे, बसपाने खाते उघडले. यशाचे श्रेय घेण्यास एकापेक्षा अधिक नेते पुढे आले, मात्र अपयशाची जबाबदारी ढकलण्याची पारंपरिक प्रवृत्ती यावेळीही दिसून आली.

Voter shock to all political parties in Nagar Panchayat elections | नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मतदारांचा झटका

नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मतदारांचा झटका

googlenewsNext
ठळक मुद्देयशाचे श्रेय घेताना अपयशाची जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न; निकालाचा अन्वयार्थ मोलाचा

६ नगर पंचायतींचा निकाल हा उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राजकीय पक्षांना दिशा दाखविणारा आणि मतदारांचा कौल कोणाला आहे, हे स्पष्ट करणारा आहे. एकूण १०२ जागा असताना मतदारांनी प्रमुख तीन पक्षांना समप्रमाणात त्या विभागून दिल्या आहेत. भाजपला ३०, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला २८ तर शिवसेनेला २५ जागा दिल्या आहेत. राज्यात सत्ता आहे, म्हणून महाविकास आघाडीला कौल दिला असेदेखील म्हणता येत नाही, कारण निफाड, सुरगाण्यासारख्या ठिकाणी आघाडीतील पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले असेदेखील नाही. देवळ्यात केदा आहेर आणि सुरगाण्यात हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कामगिरीला पावती मिळाली आहे. पेठपाठोपाठ सुरगाणा हा माकपचा किल्ला ढासळला आहे. मनसे, बसपाने खाते उघडले. यशाचे श्रेय घेण्यास एकापेक्षा अधिक नेते पुढे आले, मात्र अपयशाची जबाबदारी ढकलण्याची पारंपरिक प्रवृत्ती यावेळीही दिसून आली.

राष्ट्रवादीत नेते बहू, पण...
महाविकास आघाडी सरकारचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. पक्षनेतृत्व आणि सरकारमधील मंत्री हे पक्षाच्या आमदारांना बळ देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत. स्वत: शरद पवार हे वर्षभरात दोनदा येऊन गेले. अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील हे मंत्री देखील येऊन गेले. छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ हे सत्तेत सहभागी आहेत; पण त्याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत फार झाला असे दिसले नाही. कळवण व पेठ या पंचायती ताब्यात आल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या २८ जागा मिळाल्या. कळवणमध्ये आमदार नितीन पवार यांनी काँग्रेस व शिवसेनेशी जुळवून घेतले. पेठमध्ये झिरवाळ यांची मेहनत कामाला आली. मात्र, त्यांच्याच दिंडोरीत करिष्मा चालला नाही. निफाडमध्ये आमदार दिलीप बनकर यांना सेनेने धक्का दिला. तेथील स्थानिक आघाडी प्रभावी ठरली.

केंद्रीय मंत्र्यांवर लक्ष केंद्रित
भाजपला तुलनेने हा निकाल समाधानकारक आहे. आकडेवारीच्या भाषेत सर्वाधिक ३० जागा जिंकल्या आणि देवळा व सुरगाणा या दोन नगर पंचायतींवर वर्चस्व मिळाले. निफाडला राजाभाऊ शेलार यांनी भाजप सोडल्याने तेथे भाजपचे अस्तित्व धोक्यात आले. भोपळा फोडता आला नाही. देवळ्यात जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे वर्चस्व कायम राहिले. आता त्यांचा आमदारकीवरील दावा प्रबळ होऊ शकतो. स्वकीय डॉ.राहुल आहेर यांच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरेल. सुरगाण्यात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची ताकद दिसून आली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दीर नितीन पवार यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला तरी पक्षांतर्गत त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर
नगरपंचायत निवडणुकीत राज्यात शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिली. सेनेचा मुख्यमंत्री असतानाही दोन्ही काँग्रेसने चांगली कामगिरी केल्याने सेनेत खदखद सुरू झाली आहे. तशीच स्थिती जिल्ह्यात आहे. दादा भुसे यांच्यासारखा कॅबिनेट मंत्री आहे, त्यांनी या निवडणुकीचा प्रचारदेखील केला; पण मतदारांवर प्रभाव टाकण्यात सेनेला यश मिळालेले नाही. स्वबळावर सत्ता कोठेही मिळाली नाही. निफाडमध्ये स्थानिक आघाडीची मदत झाली. दिंडोरीत सत्ता मिळवायची असेल तर राष्ट्रवादीशी समझोता करावा लागेल. पेठमधील सत्ता पक्षाला गमवावी लागली. २५ नगरसेवक निवडून आले, हा आनंद असला तरी दमदार कामगिरी कोणत्याच ठिकाणी झाली नाही. पुढील निवडणुका लक्षात घेता पक्षाला याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. निफाडमध्ये माजी आमदार अनिल कदम यांनी वर्चस्व दाखविले, मात्र पेठमध्ये भास्कर गावीत यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

कॉंग्रेस कोमामध्ये
या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने १०२ जागांपैकी लढविल्या केवळ ३२ जागा. त्यापैकी निवडून आल्या केवळ ६. त्यातदेखील देवळा, सुरगाणा, पेठ याठिकाणी पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. कळवणमध्ये तीन नगरसेवक निवडून आले, तेदेखील राष्ट्रवादी व सेनेशी आघाडी असल्यामुळे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रचारसभादेखील घेतली. पण पक्षाचा कोणताही प्रभाव या निवडणुकीत दिसून आला नाही. ग्रामपंचायतींच्या नगरपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीतील या शहरांमधील पक्षाची कामगिरी ही पुढील जिल्हा परिषद व उर्वरित पालिका निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी होती. जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व एकमेव आमदार हिरामण खोसकर यांच्यादृष्टीने हा विषय चिंतेचा ठरायला हवा. पक्षश्रेष्ठींनीदेखील बळ दिल्याशिवाय, राज्यातील सत्तेचा लाभ मिळवून दिल्याशिवाय पक्ष कोमामधून बाहेर येणार नाही, हे निश्चित.

माकपाची पडझड
आदिवासी, कष्टकरींसाठी कार्य करणाऱ्या माकपसारख्या पक्षाची पडझड ही निकोप लोकशाहीच्या दृष्टीने हानीकारक आहे. परंतु, जे. पी. गावीत यांच्याभोवतीच पक्ष केंद्रीत राहणार असेल, दुसरी फळी तयार होणार नसेल तर ही परिस्थिती अटळ आहे, हे देखील लक्षात घ्यायला हवे. पेठ आणि सुरगाण्यात केवळ पाच नगरसेवक निवडून आले. मनसेचे एकमेव हे संख्याबळ यंदादेखील कायम राहिले. पण कळवणचे चेतन मैंद हे एकमेव नगरसेवक हिरो ठरले. त्यांनी सत्ताधारी आघाडीच्या मातब्बर व्यापारी उमेदवाराचा पराभव केला. बसपाने निफाडमध्ये खाते उघडले. अपक्ष उमेवार दोन ठिकाणी निवडून आले. ओबीसी आरक्षणाचा वाद निर्माण झालेला असताना दोन टप्प्यात झालेल्या या निकालाचा अन्वयार्थ प्रामाणिकपणे समजून घेतल्यास पुढील निवडणुकांची रणनिती ठरवायला राजकीय पक्षांना सोयीचे होईल.

Web Title: Voter shock to all political parties in Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.