नाशिकमध्ये भाजपाच्या साऱ्याच आमदारांची उमेदवारी गॅसवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 09:57 AM2019-09-15T09:57:46+5:302019-09-15T10:02:19+5:30

भाजपातच नव्हे तर यापूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतदेखील एखाद्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार असेल तर त्यात पक्षातच एक-दोन प्रबळ दावेदार वगळता अन्य सर्वच जण बाजूला असत.

Nashik: All BJP MLAs confused about there candidature for upcoming Vidhan sabha 2019 | नाशिकमध्ये भाजपाच्या साऱ्याच आमदारांची उमेदवारी गॅसवर!

नाशिकमध्ये भाजपाच्या साऱ्याच आमदारांची उमेदवारी गॅसवर!

Next

- संजय पाठक
नाशिक : निवडणुकीत जेव्हा पक्ष प्रबळ असतो तेव्हाच इच्छुकांची संख्या अधिक असते आणि साहजिकच त्यामुळे प्रस्थापित अडचणीत येतात. नाशिकमध्ये सध्या भाजपात हेच चित्र दिसत आहे. भाजपात चार विद्यमान असताना खरे तर दुसऱ्या पक्षातून येणारे इच्छुक थांबू शकतात. परंतु सध्या तर एकेका मतदारसंघातून पाच ते दहा इच्छुक त्यातून सुरू झालेली वादावादी आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या धक्कातंत्राचा वापर यामुळे विद्यमान असूनही पक्षाचे सारे आमदार उमेदवारीबाबत गॅसवर आहेत.


भाजपाच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघितला तर पंधरा मतदारसंघांपैकी सर्वाधिक चार आमदार निवडून आले आहेत. यापूर्वी १९९० मध्ये ज्ये संख्याबळ होते तेच आतादेखील सध्या आहेत. सध्या नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप, पश्चिममधून सीमा हिरे, मध्यमधून देवयानी फरांदे तर चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर हे उमेदवार आहेत. १९९० आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फरक इतकाच होता की, १९९० मध्ये शिवसेनेशी युती होती तर २०१४ मध्ये युतीशिवाय निवडणूक म्हणजे स्वबळावर यश मिळवले होते. त्यानंतर आता त्यापेक्षा अधिक अनुकूल वातावरण असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाकडे अनेक मतदारसंघांत इच्छुक वाढणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र, असे असले तरी नाशिकमधील सर्वच उमेदवारांना पक्षांतर्गत मोठे आव्हान उभे राहत आहे.


भाजपातच नव्हे तर यापूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतदेखील एखाद्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार असेल तर त्यात पक्षातच एक-दोन प्रबळ दावेदार वगळता अन्य सर्वच जण बाजूला असत. परंतु आता भाजपात तशी स्थिती राहिली नाही. त्याचे कारण म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. आदिवासी भागात भाजपाचे नामोनिशाण नसतानादेखील कमळ सर्वत्र पोहोचवून तीन वेळा सलग विजयी झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण गेल्यावर्षी अडीच लाख मतांनी निवडून आले होते. मात्र त्यांनाच डच्चू देत भाजपाने चव्हाण यांनी ज्यांना अडीच लाख मतांनी पराभूत केले होते त्या राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार यांनाच पक्षाने घेतले आणि उमेदवारी दिली इतकेच नव्हे तर निवडूनदेखील आणले. चव्हाण हे राजकारणातील ज्येष्ठ त्यातच अटल बिहारी वाजपेयी सरकारवर अविश्वास ठराव आणला गेला तेव्हा आयसीयूत असतानादेखील एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये जाऊन त्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. अशा व्यक्तीलाच जर भाजपा बाजूला सारू शकते तर आपले काय? असा प्रश्न आता आमदारांना सतावू लागला आहे.


२०१४ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर २०१७ मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी पक्षाची सत्ता यावी यासाठी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसे यातून आलेल्यांची घाऊक भरती करण्यात आली. महापालिकेत १२२ पैकी ६६ जागा मिळवून भाजपाने यश मिळवले असले तरी त्यावेळी पक्षात आलेले कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचेच अनेकजण आता भाजपाच्या आमदारांसमोर आव्हान उभे करीत आहेत. बरे तर पूर्वीप्रमाणेच भाजपात प्रोटोकॉल विषय राहिला नसून कोणीही इच्छुक आपल्या संबंधातून किंवा अन्य कोणामार्फत थेट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांना भेटून येतात आणि त्यातून दावेदारी करत आहेत. महापालिकेतील सत्ता हा शहरातील तिघा आमदारांचा वीक पॉइंट आहे. त्यामुळे त्याबाबतदेखील पक्षातील नगरसेवक आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या विरोधात जाहीर विधाने करीत आहेत. त्यांना गप्प करून पक्षशिस्त सांगण्याऐवजी अशांना पाठबळ दिले जात असल्यानेदेखील आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक शहरात तर विद्यमान आमदार असतानाही पक्षातील इच्छुकांनी जाहीर प्रचार सुरू केला असून, आमदारांना उमेदवारी परत मिळणार नाही, असेही ते ठामपणे सांगत आहेत. असा प्रकार भाजपात प्रथमच घडत आहे.


जी बाब शहरी मतदारसंघातील तीच ग्रामीणमध्येदेखील होत आहेत. चांदवड- लासलगाव मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांनादेखील अन्य इच्छुकांनी भंडावून सोडले आहे. भाजपात पूर्वी डॉ. दौलतराव आहेर, बंडोपंत जोशी यांच्या सारखे ज्येष्ठ नेते होते. ते आता हयात नाहीत, ज्यांच्याकडे स्थानिक स्तरावर नेतृत्व ते बहुतांशी एकाच वेळी पक्षात आलेले आणि समवयस्क आहेत. अशावेळी आता सर्वच जणांचे लक्ष नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लागून आहे. नाशिकच्या उमेदवारीत त्यांचा शब्ददेखील मोलाचा असून त्यामुळे महाजन यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Web Title: Nashik: All BJP MLAs confused about there candidature for upcoming Vidhan sabha 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.