महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:24 AM2019-09-20T01:24:53+5:302019-09-20T01:25:41+5:30

नार-पार प्रकल्पाचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्टÑाला देतानाच दमण गंगा, पिंजाळ तसेच अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम विदर्भासह सर्व महाराष्टÑच दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये गुरुवारी (दि.१९) केली आहे. महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

Maharashtra will be free from drought; Announcement of Chief Minister Fadnavis | महाराष्टÑाला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी नाशिककरांना हात उंचावून अभिवादन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी. व्यासपीठावर पंकजा मुंडे, सरोज पांडे, सुधीर मुनगंट्टीवार, उदयनराजे भोसले, गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, यादव, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल आदी.

Next
ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेचा समारोप : शरद पवार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

नाशिक : नार-पार प्रकल्पाचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्टÑाला देतानाच दमण गंगा, पिंजाळ तसेच अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम विदर्भासह सर्व महाराष्टÑच दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये गुरुवारी (दि.१९) केली आहे. महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
पंचवटीतील तपोवन येथे झालेल्या सभेत बोलताना त्यांनी महाराष्टÑातील पाणीप्रश्न आगामी पाच वर्षांत सोडविण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्टÑवादीवर टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. पूर्वीच्या काळी आमच्याकडे खतावणी लिहिणारे लोक होते, असे म्हणणाऱ्या पवार यांची राजेशाही मानसिकताच दिसून येते. त्यांची राजेशाही मानसिकता तर आमची सेवकांची भूमिका आहे. त्यांच्या मानसिकतेतून ते बाहेर पडत नसल्यानेच लोकांनी त्यांच्या ऐवजी सेवकांना निवडून दिले आणि हे सेवकांचे सरकारच होते, अशा शब्दात टीका केली. काँग्रेस आणि राष्टÑवादीचे अस्तित्वही आता महाराष्टÑात दिसत नाही अशी कोपरखळी त्यांनी मारली. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने देशातील १२ कोटी जनतेचे आशीर्वाद घेतले. तेच महत्त्वाचे आहेत. काँग्रेस आणि राष्टÑवादी नेमकी हेच विसरली त्यामुळे त्यांना जनतेने घरी बसवले, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर महाराष्टÑातील राजकारणातील पारंपरिक सोशल इंजिनिअरिंग बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मुख्यमंत्री केले. महाराष्टÑात विकासाची आणि देशाला सर्वाेच्च पुढे नेण्याची क्षमता असूनदेखील गेल्या अनेक वर्षांत कॉँग्रेस तसेच राष्टÑवादीच्या कारभारामुळे हे राज्य भ्रष्टाचाराचा अड्डा बनले होते. दलाल आणि भ्रष्टाचाराचा हा डाग पुसण्याची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडून व्यक्त केली होती. तेच काम करताना महाराष्टÑावर डाग लागू दिला नाही, असे सांगत फडणवीस यांनी कॉँग्रेस आणि राष्टÑवादीवर टीका केली. त्याचप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचा सरकारचा मानस आहे, त्यातील एक ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असेल, असा दावादेखील फडणवीस यांनी केला.
दरम्यान, यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
एकनाथ खडसे राहिले वंचित
च्महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत व्यासपीठावर पहिल्या रांंगेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती लाभली. परंतु, सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे आदींना भाषणाची संधी मिळत असताना खडसे मात्र त्यापासून वंचित राहिले.
राजकीय पदांच्या लाभापासून वंचित असलेल्या खडसे यांनी गेल्या तीन-चार वर्षांत फडणवीस सरकारला खडे बोल सुनावत अडचणीत आणण्याचीच भूमिका वठविलेली आहे. त्यामुळे खडसे यांच्या भाषणाकडेही लक्ष लागून होते परंतु, त्यांना तशी संधी मिळालीच नाही. मात्र, मोदी यांचे भाषण संपल्यावर त्यांनी मोदींची भेट घेऊन हस्तांदोलन करीत त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान मानून घेतले.
आठवलेंनी मिळविल्या टाळ्या
केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे राजकीय चारोळ्या सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. ते म्हणाले-
‘तोडून आलो आहे कॉँग्रेस, राष्टÑवादीचे बंधन
करतो आहे मी छत्रपती शिवरायांना वंदन,
देवेंद्र फडणवीस घेऊन आले आहे विकासाचे चंदन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार विरोधकांचे रणकंदण
देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे यात्रा,
म्हणून महाराष्टÑात चालणार नरेंद्र मोदींची मात्रा’
रामदास आठवले यांचे भाषण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी आगमन झाल्याने त्यांना नंतर आवरते घ्यावे लागले.

Web Title: Maharashtra will be free from drought; Announcement of Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.