मराठी भाषेत शिकून नोकऱ्या मिळत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:38 AM2019-08-24T00:38:34+5:302019-08-24T00:39:17+5:30
महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे.
नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. एचपीटी कला आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत.
महाविद्यालयाच्या शिक्षणक्रमातील दुसºया वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मराठी तरुणांकडून मातृभाषेचा वापर या विषयावर नाशिक शहरात सर्वेक्षण केले. मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान ९८ टक्के तरुणांना आहे. मात्र मराठी भाषेला सध्या अभिजात दर्जा मिळावा यासाठी बरीच चळवळ सुरू असली तरी अभिजात मराठी म्हणजे काय याबाबत युवावर्ग अनभिज्ञ आहे. सर्वेक्षणातील ७४ टक्के युवकांनी याबाबत अनभिज्ञता दर्शविली आहे. इतर भाषांच्या तुलनेत मराठी अवघड असल्याचे ४९ टक्के तरुणांचे मत असले तरी पदवीस्तरावर मराठी विषय घेणाऱ्यांची संख्या घटल्याचे ७६ टक्के युवकांनी मान्य केले आहे.
मराठीचा वापर वाढविण्यासाठी आणि ती जगवण्यासाठी राज्यात सर्वच भाषिकांसाठी मराठी सक्तीची करावी असे ६८ टक्के युवकांचे मत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. मातृभाषेत हिंदी आणि इंग्रजी भाषांतील शब्दांचा वापर वाढल्याचे ८४ टक्के युवकांचे मत आहे. तसेच चित्रपट आणि मालिकेतील बोलीभाषेचा परिणाम मातृभाषेवर होतो, असे ८८ टक्के युवकांनी सांगितले. सध्या अनेक मालिकांमधील चालतय की, बोलतोय की, चालेल की, असे शब्द वापरले जातात. याशिवाय सोशल मीडियावरील मराठीदेखील प्रमाण भाषा बिघडविण्यास कारण असल्याचे मत ५३ टक्के युवकांनी व्यक्त केले. मराठी भाषेत अश्लील शब्दांचा वापर होत असल्याचे ८५ टक्के मत आढळले. यावरून युवकांच्या म्हणजेच भावीपिढीतील मातृभाषेच्या पालनपोषणासाठी ही धोक्याच घंटा असल्याचेदेखील या कौलातून स्पष्ट झाले.
पत्रकारिता विभागाच्या प्रमुख उपप्राचार्या डॉ. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मराठी भाषेला अभिजात म्हणून दर्जा मिळाला तर नेमके काय फायदे होतील हे सर्वेक्षणातील ७४ टक्के युवकांना माहिती नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीचे निकष युवकांना माहिती नाही, त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यास संवादासाठी मराठीचा वापर वाढेल जागतिक स्तरावर मान्यता मिळेल, ती व्यवहार भाषा होऊ शकेल असे अनेक गैरसमज या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. मराठीचे शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही, असे मत व्यक्त करण्यात आले खरे; परंतु मराठी राजभाषाच नव्हे तर ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे मतही युवा वर्गाने व्यक्त केले.