गाथा पारायण सोहळ्यातील निधी निवृत्तिनाथ संस्थानला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:37 PM2020-11-20T21:37:07+5:302020-11-21T00:53:15+5:30
त्र्यंबकेश्वर : यावर्षी २४ फेब्रुवारीपासून त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा येथील विस्तीर्ण जागेत संपन्न झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहळ्याची सांगता ४ मार्च २०२० रोजी झाली होती.
त्र्यंबकेश्वर : यावर्षी २४ फेब्रुवारीपासून त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा येथील विस्तीर्ण जागेत संपन्न झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहळ्याची सांगता ४ मार्च २०२० रोजी झाली होती. या पारायण सोहळ्यातील शिल्लक राहिलेला निधी येथील निवृत्तिनाथ संस्थानला देण्यात आला. सोहळ्याचे प्रवर्तक बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते संस्थानच्या विश्वस्तांकडे ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये झालेल्या गाथा पारायण सोहळ्याची सांगता झाली आणि पुढे कोरोनामुळे देशभर लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे गाथा पारायण सोहळ्याच्या खर्चाचा ताळेबंद वारकरी बांधवांपुढे त्यावेळी मांडता आला नव्हता. या सोहळ्याचे प्रवर्तक बंडातात्या कराडकर यांनी सोहळ्याच्या संपूर्ण खर्चातून उरलेला पूर्ण निधी हा निवृत्तिनाथ समाधी संस्थानास जीर्णोद्धाराच्याकामी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार, अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी धनादेशाद्वारे निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत, ह.भ.प. माधव महाराज घुले, ह.भ.प. गावले महाराज, ह.भ.प. राठी महाराज, ह.भ.प. संजयनाना धोंडगे, धनश्री हरदास, रामभाऊ मुळाणे, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे, संतोष कदम, दत्तूकाका राऊत, प्रवीण वाघ, ज्ञानेश्वर माऊली आरोटे, सागर महाराज दौंड, मधुकर लांडे आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. बंडातात्या कराडकर यांनी गाथा पारायण सोहळा भव्य करून तर दाखवलाच, पण उर्वरित पैशांचा विनियोगदेखील चांगल्याकामी लावला, याबद्दल कराडकर यांच्याविषयी मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. ज्यांनी या गाथा पारायण सोहळ्यात योगदान दिले. तन-मन-धनाने ज्यांनी परिश्रम घेतले अशा व्यक्तींच्या श्रमपरिहारानिमित्ताने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमहालक्ष्मी राइस मिल्सचे मालक व त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम यांनी गाथा पारायण सोहळ्यात मोठे योगदान दिले. त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आपल्या भाषणात केला.