कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 03:21 PM2020-05-10T15:21:57+5:302020-05-10T15:22:59+5:30

कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे.

Foreign workers continue their journey from Nashik via Kasara | कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

googlenewsNext
ठळक मुद्देआपला संसार डोक्यावर घेत मुळ गावाच्या दिशेने प्रवासद्वारकासर्कलवरसुध्दा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी

नाशिक : शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे अद्यापही पायी प्रवास करत दाखल होत आहे. मध्यप्रदेशसह अन्य राज्यांत जाणारे हे लोंढे रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. राज्य सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली असली तरी बहुतांश प्रवासी मजूर आपला बिºहाड घेत पायपीट करताना दिसून येत आहेत. काही मजूर ‘डिस्टन्स’ बाजूला ठेवत मिळेल त्या मालवाहू वाहनांमधूनही प्रवास करत आहेत.
कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. गोरगरीब हातावर मोलमजुरी करणाऱ्या या जमातीने आपला संसार डोक्यावर घेत मुळ गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या मजूरांचा प्रवास काहीसा जीवघेणाही ठरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मालगाडीच्या अपघाताने अवघे राज्य नव्हे तर देश हादरला. ‘पटरी पर जिंदगी आते आते, मौत ही आ गयी’ असे ही दुर्घटना सांगून गेली.
करोना विषाणूच्या महामारीमुळे कष्टकरी मजुरांचा जगण्याच संघर्ष सुरू आहे. जवळचे पैसे संपले, हाताचा रोजगार गेला, मग, परराज्यात थांबून करणार तरी काय? या प्रश्नाचे मनात काहूर उठले अन् आपल्या घराची ओढ अधिकच अस्वस्थ करणारी ठरू लागली. संसाराचा बि-हाड बांधून ही मंडळी डोक्यावर घेत मुळ गावाच्या प्रवासाला लागली.
नाशिक जिल्ह्यातून मार्गस्थ होणा-या या मंडळींची कुठल्याहीप्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. इगतपुरीपासून तर थेट चांदवडपर्यंत ठिकठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावर या मजुरांना भोजन, पाणी पुरविले जात आहेत. सरकारने सुध्दा आता प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तसेच राज्य सरकारनेही या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्याच्या वेशीपर्र्यंत थेट ‘लालपरी’ मोफत उपलब्ध केली आहे; मात्र तरीदेखील मजूरांची पायपीट सुरूच आहे. तसेच मिळेल त्या वाहनाने हे मजूर प्रवसाला लागले आहेत. दरम्यान, परस्परांमधील ‘डिस्टन्स’बाबतदेखील उदासिनता मजुरांमध्ये दिसून येत आहे. काही लोक मास्क बांधत आहेत, तर काही मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पायपीट करणारे मजुरांचे जत्थे नाशकात पोहचल्यानंतर गरवारे पॉइंट ते थेट जुना आडगावनाक्यपर्यंत असलेल्या उड्डाणपूलाच्या सावलीखाली हिरवळीवर विसावत असल्याचेही दृश्य आहे. शंभर दोनशे किलोमीटर पायपीट केल्यानंतर आलेला थकवा घालविण्यासाठी मजुर वर्ज उड्डाणपूलाच्या सावलीला असलेल्या दुभाजकांमधील जागेत झोप काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळीदेखील ‘डिस्टन्स’चा मात्र या गोरगरीबांना विसर पडत असल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोकाही संभवतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये रवाना होणारे हे मजूर नाशिकच्या वेशीत प्रवेश केल्यानंतर अधिकच सुखावल्याचे चित्र दिसते. नाशिककरांनी माणुसकी धर्म जोपासत या गोरगरीब थकलेल्या आपल्या भारतीय मजुरांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे काही मजुरांनी तर अशी मानवता आम्ही अद्याप कुठल्याही ठिकाणी बघितली नाही, यामुळे नाशिक सोडताना नक्कीच आम्हाला पुढचा प्रवास करण्याचे बळ लाभत आहे, अशाही भावना व्यक्त केल्या. इगतपुरीत या मजुरांना काही ठिकाणी मोफत पादत्राणेही वाटप करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅँकरसुध्दा उभे करण्यात आले आहे. द्वारकासर्कलवरसुध्दा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी लावण्यात आली आहे.

Web Title: Foreign workers continue their journey from Nashik via Kasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.