संरक्षक कठड्यांअभावी पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:33 PM2020-02-24T23:33:53+5:302020-02-25T00:22:46+5:30
इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना ...
इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत अथवा जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात पर्यटनाचा विकास पहाता भावली धरण व या भागातील धार्मिक स्थळांना भेट देण्याकरिता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलीसह पर्यटकांची कायम गर्दी असते. भावली, बोर्ली, जामवाडी, मानवेढे, फांगुळगाव, नांदगाव सदो, पिंपरी संदो, जामुंडे, गवांडे आदींसह बारा वाडी-वस्तीच्या ग्रामस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचा पूल तयार केला; पण त्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत वा कोणता अधार नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटना घटल्या आहेत. शाळकरी मुलांचेदेखील अनेक अपघात झाले आहेत. मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे यांनी याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. मात्र या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत आहे. पर्यटकांच्या आणि ग्रामस्थांच्या जीविताची सुरक्षा म्हणून या पदाचारी पुलाला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे, अशी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. सदर पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम येत्या काही दिवसात सुरू झाले नाही तर या भागातील सर्व ग्रामस्थ जनअंदोलनाचा पवित्रा घेतील, असे मेंगाळ यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार
मेंगाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान आडोळे, मुंबई येथील प्रभू नयन फाउण्डेशनचे आनंद मवाणी, माजी नगरसेवक यशवंत दळवी, पं. स.चे माजी सदस्य नंदलाल भागडे, मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे, दादा पाटील भागडे, जयराम गव्हाणे आदी उपस्थित होते. पुलाजवळ धनुष्यतीर्थ स्थान असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक विधी व यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. हजारो भाविक यात्रेला येतात, तर अनेक प्रकारची दुकाने या पुलावरच थाटतात. त्यात दररोज लहान-मोठी वाहने मार्गक्र मण करत असतात. यात मोठी दुर्घटना होणे शक्य असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे किंवा भिंत उभारावी याकरिता महाशिवरात्र यात्रेच्या दिवशी माजी आमदार मेंगाळ व पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान आडोळे, सरपंच भाऊराव भागडे, पं.स.चे माजी सदस्य नंदलाल भागडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भागडे यांनी प्रत्यक्ष पुलाची पहाणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करीत या विषयाबाबत सविस्तर माहिती दिली.