जैवविविधतेसाठी निसर्गातील काजवा वाचविण्याची गरज !

By अझहर शेख | Published: May 22, 2019 12:48 AM2019-05-22T00:48:55+5:302019-05-22T00:50:29+5:30

मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो....

 Biodiversity need to save lives! | जैवविविधतेसाठी निसर्गातील काजवा वाचविण्याची गरज !

जैवविविधतेसाठी निसर्गातील काजवा वाचविण्याची गरज !

Next

नाशिक : मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो.... मनमुरादपणे काळ्याकुट्ट अंधारात लखलखतो तो काही दिवसांसाठी... वर्षा आरंभ होताच निसर्गाची ही प्रकाशफुले विझतात ती कायमचीच... काजवा बघण्यासाठी माणसांची जशी झुंबड कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य असलेल्या भंडारदरा परिसरात उडते, तशी काजवा वाचविण्यासाठीही माणसालाच धडपड करावी लागणार आहे, अन्यथा हा दुर्मीळ अन् आकर्षक असा कीटक जैवविविधतेतून कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका आहे.
मे महिन्याच्या अखेरचा आठवडा सुरू झाला असून, निसर्गप्रेमी तसेच व्यावसायिकांकडून ‘काजवा महोत्सव’चे ब्रॅन्डिंगचे सोशल मीडियावर पेव फुटले. सुदैवाने संयुक्त राष्टÑाकडून याच महिन्यात अखेरच्या आठवड्यात जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्याबाबत घोषित केले गेले आहे. या दिनाच्या निमित्ताने तरी काजवा वाचविण्यासाठी आपण मनुष्य म्हणून काय करू शकतो, याचा कृतिशील विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारदरा परिसरातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत दरवर्षी काजव्यांचा लखलखाट बघण्यासाठी हजारो ते लाखो लोकांची गर्दी रात्रीच्या अंधारात उसळते. या गर्दीमध्ये नाशिककरांची संख्याही लक्षणीय असते. बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण वेळीच आणणे गरजेचे आहे, मात्र सरकारी यंत्रणा यासाठी अपयशी ठरताना दिसून येते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वनियोजन करणे तितकेच आवश्यक आहे, परंतु त्याबाबत नाशिक वन्यजीव विभागाची उदासीनता कायम आहे.
निशाचर जैवविविधतेवर ‘संक्रांत’
काजवा महोत्सवाच्या निमित्ताने अभयारण्य
क्षेत्रात पर्यटकांचा वाढता धिंगाणा, मद्यपींच्या
ओल्या पार्ट्या, चारचाकी मोटारींचा लख्ख प्रकाश
अन् हॉर्नचा गोंगाट यामुळे महिनाभर अभयारण्यातील निशाचर प्राणी-पक्ष्यांची जैवविविधता
धोक्यात सापडते. जणू आपल्या हक्काच्या अधिवासावर मानवाने हल्लाच चढविला आहे की
काय असाच भास या क्षेत्रातील मुक्या वन्यजिवांचा
होत असावा.
...तर डोळ्यांपुढे ‘काजवे’ चमकतील
निसर्गात बागडताना त्याचा आनंद लुटताना बेभान होऊन चालणार नाही याचा विसर माणसाला काजव्यांच्या दुनियेत पाऊल ठेवताना हमखास पडतो. निसर्ग व त्यामधील जैवविविधता दीर्घकाळ टिकवायची असेल तर भानावर राहून त्याचा आनंद घ्यावा लागेल, अन्यथा वैश्विक तपमान वृद्धीच्या स्वरूपात पर्यावरणाचा बिघडत जाणारा समतोलाच्या रूपाने आताच जगापुढे ‘काजवे चमकायला लागले’ आहे, हे तितकेच खरे.
या प्रजातीच्या रोपांची हवी लागवड
अभयारण्यातील वृक्षसंपदेवर काजव्यांचे नृत्य काळोखात सुरू असते; मात्र काजवे अधिकाधिक पसंती काही निवडक प्रजातीला देतात. त्यामध्ये भारतीय प्रजाती बेहडा, हिरडा, सादडा, जांभूळ, उंबर अशा झाडांवर काजव्यांचा अधिवास मोठ्या संख्येने पहावयास मिळतो. यामुळे आपापल्या परिसरातील मोकळ्या भूखंडांवर येत्या पर्यावरणदिनाच्या निमित्ताने वरील प्रजातीच्या रोपांची लागवड व संवर्धन करण्यावर भर दिल्यास काजवे शहराच्या आजूबाजूलाही चमकतांना दिसतील.
पायी भ्रमंतीला प्राधान्य द्यावे
चारचाकी किंवा दुचाकीवर फेरफ टका मारून काजव्यांच्या दुनियेचा आनंद घेता येतो हा गैरसमज निसर्गप्रेमींनी प्रथमत: दूर करायला हवा. वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळामध्ये शिस्तीने वाहने उभी करून पायी भ्रमंती करत काजव्यांनी लखलखले झाड बघावे. काजव्यांनी उजळून निघालेल्या झाडांवर फोटोसाठी दगड, माती फेक ण्याचा प्रयत्न करू नये. नाशिक वन्यजीव विभागासह राजूर पोलिसांनीदेखील महिनाभरासाठी भंडारदरा-राजूर, भंडारदरा-रतनवाडी, शेंडी-घाटघर या मार्गांवर गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Biodiversity need to save lives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.