निधीचा सुकाळ तरीही समस्या का? प्रधान सचिवांनी उपस्थित केला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:01 PM2020-10-31T12:01:22+5:302020-10-31T12:01:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. सुविधाही भरपूर उपलब्ध करून दिल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. सुविधाही भरपूर उपलब्ध करून दिल्या आहेत. असे असतांना आरोग्य सेवेच्या तक्रारीच नको. परंतु दुर्देवाने तक्रारी असल्याचे दिसून येते. प्रत्येक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आणि ग्रामिण रुग्णालयांमध्ये दररोज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे अशा सुचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॅा.प्रदीप व्यास यांनी येथे आयोजित बैठकीत दिल्या.
आकांक्षीत जिल्ह्याच्या अनुषंगाने कोवीडनंतरची आरोग्य सेवा, आरोग्य सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना याची पहाणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात दाखल होते. जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांची पहाणी या पथकांनी केली. तिसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व पथकांकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आरोग्य विभागाच्या संचालक डॅा.अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक डॅा.सतीष पवार, जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड जि.प.सीईओ रघुनाथ गावडे यांच्यासह पथकातील संचालक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रधान सचिव डॅा.व्यास यांनी सांगितले, जिल्ह्याची निवड आकांक्षीत जिल्हा म्हणून झाली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्याची चांगली संधी आहे. जिल्ह्याला आधीपासूनच निधीची कमरता नाही. त्यामुळे गाव पातळीवर आरोग्य सेवा पोहचण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. काही ठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी उपिस्थत राहणे आवश्यकच आहे. जिल्ह्याने कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. कोरोनाला अटकाव देखील ठेवला आहे. आता कोरोना पश्चात आरोग्य सेवा आणखी सुधारावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सिकलसेल, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू रोखण्यासाठी त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे काम मोलाचे आहे. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक कर्मचारीकडे थर्मल स्कॅनींग, ऑक्सीमिटर हे दिलेच पाहिजे. जिल्ह्यात ते दिले गेले नसल्याचे निर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. तरंगता दवाखानाचा उद्देश हा त्या त्या भागात हा दवाखाना जाऊन त्या परिसरातील गावांमध्ये सोयी देण्यात याव्या असा असतांना गावकऱ्यांना तेथे बोलविले जाते हे चुकीचे असल्याचेही व्यास यांनी सांगितले.
सुरुवातीला तालुकानिहाय नियुक्त दहा पथकांनी त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांचे सादरीकरण केले. त्यात अडचणी, समस्या, मिळणाऱ्या सुविधा, आवश्यक उपाययोजना यांचा त्यात समावेश होता.
संचालिका डॅा.अर्चना पाटील, डॅा.सतीष पवार यांनीही विविध बाबींचा आढावा घेत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.नितीन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.रघुनाथ भोये यांनी देखील समस्या व अडचणी मांडल्या. पहाणी करणाऱ्या पथकांमध्ये संचालक रवींद्र शेळके, सहसंचालक डॅा.नितीन अंबोडकर, डॅा.विजय कंदेवाड, डॅा.आर.एस.पारधी, डॅा.पटन शेट्टी, डॅा.अडकेकर, डॅा.संजीव जाधव, डॅा.प्रकाश पाडवी, डॅा.उमेश शिरोडकर, डॅा.अरुण यादव, डॅा.गोविंद चौधरी आदींचा त्यात समावेश होता.