वर्षभरानंतर धावणार रुळावर गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:42 PM2020-01-20T14:42:23+5:302020-01-20T14:46:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात पाचवी पंचवार्षीक निवडणूक पार पडून नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात पाचवी पंचवार्षीक निवडणूक पार पडून नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्विकारला. या काळात सात महिने तत्कालीन पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली तर सहा महिने प्रशासकांनी कारभार सांभाळला. दरम्यान, पाचव्या टर्मच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्विकारला असून २७ जानेवारी रोजी नवीन सभापती निवड होऊन ते देखील पदभार घेणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेची गाडी रुळावर धावणार आहे.
१ जुलै १९९८ रोजी जिल्हा निर्मिती झाली. त्यानंतर धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा परिषद वेगळी करण्याची प्रक्रिया चार महिने चालली. सर्व कारभार वेगळा झाल्यानंतर नवनियुक्त नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लागलीच अर्थात नोव्हेंबर १९९८ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लागली.
अशा राहिल्या निवडणुका
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला होता. जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान नवापूर तालुक्याच्या माध्यमातून कै.हेमलता वळवी यांना मिळाला. त्यावेळी प्रत्येकी एक वर्षासाठी अध्यक्षपद राहत होते. त्यावेळी चार जणांना संधी मिळाली. पाच वर्षाची पहिली टर्म नंतर नोव्हेंबर २००३ साली दुसरी निवडणूक पार पडली.
यावेळी देखील काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला. अध्यक्षपदी नवापूर तालुक्याच्या माध्यमातून रेखा शिरिष वसावे या विराजमान झाल्या. त्यावेळी प्रत्येकी अडीच वर्षांचा कार्यकाळ होता. ती पंचवार्षीक पार पडल्यानंतर नोव्हेंबर २००८ साली तिसरी पंचवार्षीक निवडणूक झाली. त्यात मात्र राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवीत सत्ता स्थापन केली आणि पुन्हा नंदुरबार तालुक्याच्या माध्यमातून कुुमुदिनी विजयकुमार गावीत या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.
पुर्ण पाच वर्ष अध्यक्षपद सांभाळले. नोव्हेंबर २०१३ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने बहुमत मिळवीत सत्ता स्थापन केली. पहिल्या अडीच वर्षांसाठी भरत माणिकराव गावीत व दुसºया अडीच वर्षांसाठी रजनी शिरिषकुुमार नाईक यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली.
कार्यकाळ संपला,
मुदतवाढ मिळाली...
२०१३ साली निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१९ ला संपला, परंतु न्यायालयीन याचिका आणि नागपूर जिल्हा परिषदेला देण्यात आलेली मुदतवाढ ही बाब लक्षात घेता नंदुरबार जिल्हा परिषदेला देखील मुदतवाढ देण्यात आली. तत्कालीन अध्यक्षा रजनी नाईक व पदाधिकारी हे मुदतसमाप्तीनंतर सात महिने अर्थात १८ जुलै २०१९ पर्यंत पदावर राहिले.
इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक बसविला गेला. डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ या काळात मुदतवाढ मिळालेल्या तत्कालीन बॉडी बरखास्त करण्यात आली. आणि १९ जुलै रोजी प्रशासकांनी पदभार स्विकारला. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार होता. प्रशासकांनी सहा महिने पदभार सांभाळ्यानंतर १८ जानेवारी २०२० रोजी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्विकारला.
पहिल्यांदा युवकांच्या हाती सत्ता
जिल्हा परिषदेची सत्ता आता युवकांच्या हाती देण्यात आली आहे. अध्यक्षा व उपाध्यक्ष हे वयाच्या २५ ते ३० च्या घरात आहेत. दोन्हीजण पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समिती कामाचा देखील अनुभव नसतांना थेट अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. असे असले तरी दोन्ही पदाधिकारी हे राजकीय घराण्यातील, माजी मंत्री व माजी आमदारांच्या घरातून आलेले असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे प्राथमिक धडे यांना घरातूनच मिळाले असतीलच.
आता येत्या काळात मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत त्यांच्या विकासात्मक, गतीमान आणि पारदर्शक कारभाराचा कस लागणार आहे.
४अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदाच्या निवडीकडे लक्ष लागून आहे. २७ रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करण्यात येणार आहे. छाननी, माघारीच्या प्रक्रियेनंतर दुपारी दोन वाजता विशेष सभा होणार आहे. त्यात गरज असल्यास मतदान होईल अन्यथा बिनविरोध प्रक्रिया पुर्ण होणार आहे.
४सभापतीपदी कुणाची वर्णी लागते याबाबत लक्ष लागून आहे. प्रत्येक तालुक्याला संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते. काँग्रेस शिवसेनेला किती सभापतीपद देते याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून आहे.