डामरखेडा पुलाजवळ शिक्षकाला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:07 PM2020-11-19T22:07:10+5:302020-11-19T22:08:13+5:30
n लाेकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : येत्या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वीची कोरोना चाचणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील ...
n लाेकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : येत्या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वीची कोरोना चाचणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथून तळोदा येथे परतणा-या शिक्षकाचा डामरखेड्याजवळ अपघातात मृत्यू झाला. डामरखेडा पुलाजवळील खराब रस्त्यात दुचाकी अचानक घसरून शिक्षक खाली पडल्यानंतर मागून येणा-या ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा गंभीर अपघात घडला. राजेंद्र मधुकर पाटील (४०) असे मयत शिक्षकाचे नाव असून ते तळोदा येथील श्रीराम नगरातील रहिवासी होते. राजेंद्र पाटील हे पाडामुंड ता. धडगाव येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिवाळीनिमित्त ते चिमठावळ ता. शिंदखेडा येथील गावी गेले होते. गुरूवारी तेथून एमएच १८ बीएस ६९४८ या दुचाकीने परत येत असताना डामरखेडा ते प्रकाशा दरम्यान गोमाई नदीच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने राजेंद्र पाटील हे रस्त्यावर पडले. दरम्यान मागून एमएच २६ बीई १८६९ हा ट्रक आला. ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने शिक्षक राजेंद्र पाटील हे अक्षरश: चिरडले जावून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रकाशा येथे पाठवला होता. परंतू तेथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांचा मृतदेह म्हसावद ता. शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. प्रकाशा आरोग्य केंद्रातील या समस्येमुळे नातलगांनी संतापही व्यक्त केला.
याबाबत रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत होती. अपघातानंतर दीड तास प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान वाहतूक ठप्प होती.
मयत शिक्षकाचे कुटूंब गेले होते गावी
दिवाळीनिमित्त मूूळगावी गेलेले राजेंद्र पाटील परत येत असताना हा अपघात घडला. यावेळी ते एकटेच होते. त्यांची पत्नी १२ वर्षीय मुलगी व सात वर्षीय मुलासह माहेरी गेल्या होत्या. येत्या दोन चार दिवसात त्याही परत येणार होत्या.
गावाहून परत येणा-या राजेंद्र पाटील यांच्या दुचाकीवर धान्याच्या गोण्या बांधल्या होत्या. यातून खराव रस्त्यावर त्यांचा तोल गेला असावा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तळोदा येथील त्यांचे मित्र व चिमठावळ येथील कुटूंबिय घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.