जिल्ह्यात मिशन ‘शोधमोहिम’ राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:29 PM2020-06-01T12:29:26+5:302020-06-01T12:29:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल ६० हजार मजूर, विद्यार्थी व नोकरदार परराज्यासह विविध गाव व शहरातून आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल ६० हजार मजूर, विद्यार्थी व नोकरदार परराज्यासह विविध गाव व शहरातून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने नव्याने गावोगावी आरोग्य तपासणी मोहिम राबवावी अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. सध्या राज्यात ग्रामिण भागात जेथेही नवीन रुग्ण आढळत आहेत ते सर्व बाहेर गावाहून आलेले असल्याने त्यांच्या संक्रमणापासून इतरांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात कोरोनाची संख्या स्थिर ठेवायची असेल तर आरोग्य तपासणीला जोर द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून परराज्य व परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत. यात मजूरांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल विद्यार्थी असून नोकरदार मंडळींची संख्याही बऱ्यापैकी आहे. याशिवाय काहीजण रेड झोनमधून येवून नातेवाईकांकडे राहत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात जे कोरोना रुग्ण आढळले ते सर्व बाहेरगावाहून आलेले व त्यांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
साथरोग सर्व्हेक्षणात नोंद व्हावी
पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर साथरोग सर्व्हेक्षण होणार आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून परजिल्हा, परराज्यातून आलेल्या नागरिकांचीही तपासणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करून घेणे आवश्यक आहे.
याबाबत हिवताप विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांनी संयुक्त नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत लक्ष घालावे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
परत आलेल्यात केवळ स्थलांतरीत मजूर नव्हे तर खाजगी नोकरी व व्यवसायानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रहिवास करणाºयांचाही समावेश आहे़ आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़ नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़ तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़ शहादा तालुका-७ हजार ३०३़
अक्कलकुवा ८ हजार ८६३़ तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ स्थलांतरीत नागरिकांनी प्रवेश केला होता़ एकूण ६० हजार ८६२ संख्या असलेल्या या नागरिकांच्या क्वारंटाईन केंद्रांसह गावनिहाय स्क्रीनिंग करण्यात आले होते़ अद्यापही परतणाºयांची संख्या वाढत असून त्यांची माहिती घेतली जात आहे़
अनेकांचे क्वॉरंटाईन संपले
बाहेर गावाहून आलेल्यांपैकी ज्यांनी प्रशासनाला किंवा आरोग्य विभागाला कळविले त्यांची तपासणी करून होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. अशा लोकांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपला आहे. तर जे क्वॉरंटाईन होते ते अनेक ठिकाणी बिनधिक्कत बाहेर फिरत होते.
अनेकांनी तर प्रशासनाला कळविलेले नाही. यात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक भरणा आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी भितीपोटी कळविलेले नाही. त्यामुळे तो धोका कायम आहे.
अशा युवकांचा व विद्यार्थ्यांचा शोध घेणेही क्रमप्राप्त ठरणार आहे. याबाबतही प्रशासनाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.
स्वॅब तपासणीही गेल्या काही दिवसात थंडावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १,३१५ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
वास्तविक बाहेरगावाहून आलेल्यांची संख्या ६० हजार तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संपर्कातील लोकांची संख्या लक्षात घेता स्वॅब तपासणीचा आकडा हा कमीच आहे.