बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:17 PM2020-06-01T12:17:12+5:302020-06-01T12:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमात जिल्ह्यात फारसा बदल होणार नसल्याचे चित्र आहे. शाळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमात जिल्ह्यात फारसा बदल होणार नसल्याचे चित्र आहे. शाळा उघडण्याचा निर्णयाबाबत देखील स्पष्टता नाही. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांना शाळेच्या तयारीबाबत संभ्रम आहे. दरम्यान, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे गर्दीेचे कार्यक्रम सध्या बंद राहणार आहेत. दरम्यान, १ तारखपासूनच्या नवीन लॉकडाऊनबाबत जिल्हा प्रशासनातर्फे सायंकाळी उशीरापर्यंत कुठलेही निर्देश नव्हते.
शनिवारी केंद्र शासनााने पाचव्या लॉकडाऊनबाबत निर्देश दिले. त्यानंतर रविवारी राज्य शासनाने निर्देश दिले. त्यानुसार १ जनूपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. नंदुरबार जिल्हा आधीपासून आॅरेंज झोनमध्ये असल्यामुळे लॉकडाऊनच्या निर्देशांमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र आहे.
बाजारपेठचा वेळ वाढवावा...
जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमधील तरतुदींप्रमाणे अनेक बाबींना सवलती देण्यात आल्या आहेत. त्या यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आहे. बाजारपेठा सुरू ठेवण्याच्या वेळा या सध्याच्या वेळेप्रमाणेच सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत राहण्याची शक्यता आहे.
रात्री ९ वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदीची अंमलबजावणी कडक राहणार आहे. त्यामुळे दुकानांच्या वेळा सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवून मिळाव्या असा सूर व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. त्याबाबतचा निर्णय मात्र जिल्हाधिकारी घेतील किंवा कसा याकडे देखील लक्ष लागून आहे.
धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद
गेल्या २२ मार्च पासून बंद असलेली धार्मिक स्थळे यापुढील काळात देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. १ जूनपासून धार्मिक स्थळे सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने काही धार्मिक स्थळावर नियोजन देखील करण्यात आले होते. परंतु पाचव्या लॉकडाऊनमध्ये देखील धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम देखील बंद राहणार आहेत. लग्न समारंभ व अंत्ययात्रा यांच्यावरील उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.
शाळांबाबत संभ्रम कायम
शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. १५ जूनपासून राज्यातील शाळा सुरू होतात तर सीबीएसई आणि इतर माध्यमाच्या शाळा या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतात. परंतु शाळा सुरू करण्याबाबत देखील स्पष्ट निर्देश नसल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
शालेय साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने सज्ज ठेवली आहेत. परंतु शाळा सुरू होण्याचा निर्णयच होत नसल्याने ग्राहक देखील तिकडे फिरकत नसल्याची स्थिती आहे. बारावीची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली असल्यामुळे त्यांना मागणी बºयापैकी आहे. इतर साहित्याची मागणी मात्र ठप्पच आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शहरी भागात एस.टी.वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. आता ग्रामिण भागासाठी देखील सेवा सुरू होणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. आदेश येताच ते सुरू होतील. त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला ते सोयीचे ठरणार आहे.
आंतरराज्य वाहतूक मात्र जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. गुजरात व मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने वाहने ये-जा करीत आहेत. त्यांच्या तपासणीला मात्र फाटा दिला जात आहे. जिल्ह्यातून दोन महामार्ग व चार आंतरराज्य मार्ग गेलेले आहेत. गव्हाळी, नवापूर येथील सीमा तपासणी नाके आहेत. याशिवाय शहादा-खेतिया रस्त्यावर सिमेवर देखील तपासणी नाका आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करीत आहेत. त्यात सध्या जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आता आंतरजिल्हा ये-जा करण्यासाठी पासची गरज राहणार नसल्यामुळे वाहनांची संख्या अधीक राहणार असल्याचे चित्र आहे.