शहरातील रस्ते घेताहेत मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:10 PM2019-12-13T12:10:14+5:302019-12-13T12:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा शहरातील मुख्य समस्या असलेले अतिक्रमण निघाल्याने शहराचे रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा शहरातील मुख्य समस्या असलेले अतिक्रमण निघाल्याने शहराचे रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहादा नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटवले. परंतु यापुढे काय असा प्रश्न आता नागरिकांसमोर आहे. निघालेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी पालिका प्रशासन काय काळजी घेणार याकडेही शहराचे लक्ष लागून आहे.
शहादा शहर विकसित शहर असून, शहराचा चोहोबाजुने विस्तार होत आहे. शहराचा विस्तार होत असतांना संपूर्ण शहरांस अतिक्रमणाचा विळखा पडला होता. शहराचे बस स्टॅण्ड, न्यायालय, भाजी मंडई, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, नगरपालिका यांना अतिक्रमणाने वेढले होते. शहरात सर्वत्र अतिक्रमणाच्या टपऱ्यांचे कावळ्याच्या छत्रीप्रमाणे झालेले अतिक्रमण सर्वांच्याच डोकेदुखीचा विषय झाला होता. अतिक्रमणाने शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. शहादा बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ झालेल्या अतिक्रमणामुळे बस चालकांना बस चालविण्याची कसरत करावी लागत होती. बस स्थानक ते पटेल पेट्रोल पंप हा दुहेरी मार्ग असूनही या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने रहदारीची कोंडी होत होती. महात्मा फुले चौक तर अतिक्रमणाने वेढला गेला होता. भला मोठा चौक असूनही चोहोबाजुंच्या अतिक्रमणामुळे या चौकात रहदारीची कोंडी होत होती. बस स्थानक ते पटेल रेसिडेन्सीपर्यंतचा डोंगरगाव रोड याची देखील अशीच अवस्था होती.
या रोडवर झालेल्या अतिक्रमणाने नेहमीच रहदारीला अडथळा निर्माण होत होता. भाजी मंडईच्या दोन्ही रस्त्यावर छोट्या व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना विशेषत महिलांना अतिक्रमणाचा सामना करावा लागत होता. नगरपालिकेसमोरील चौक अतिक्रमणाने वेढला गेल्याने चौकात दुचाकीदेखील उभी करणे अशक्य होत असे. भाजी मंडईत जाणाºया नागरिकांना व शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना या अतिक्रमणातून मार्ग शोधत जावे लागते.
शहरातला एकमेव मेनरोडदेखील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने शहराची नेहमीची रहदारीदेखील अडचणीची ठरत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असे. शहरातील या सर्व समस्यांची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश पालिकेला दिले होते. याची दखल घेत पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेने याबाबत अतिक्रमण धारकांना सुचित केल्यानंतर अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून पालिकेला सहकार्य केले. पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होण्यापूर्वीच अतिक्रमण निघाल्याने पालिकेचा वेळ व पैसा वाचला आहे. शहरातील अतिक्रमण निघाल्याने व रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पालिकेने यापूर्वीही अनेकवेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. मात्र अतिक्रमण काढल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याचे कोणतेही नियोजन, खबरदारी पालिका प्रशासनाने न घेतल्याने प्रत्येक वेळी तेथे पुन्हा अतिक्रमण होऊन पालिकेचा प्रचंड पैसा व वेळ वाया गेला आहे. मागील हा अनुभव बघता या वेळी तरी नगरपालिका पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून काही ठोस पावले उचलणार आहे कां? हा खरा प्रश्न आहे. अन्यथा पुन्हा येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे अतिक्रमण जैसे थे होण्यास वेळ लागणार नाही. पालिकेसमोरील चौक सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव पालिकेने मागे केला होता. आता चौक मोकळा झाल्याने पालिकेने तेथे लगेचच सुशोभिकरणाचे काम हाती घेतल्यास चौकात पुन्हा अतिक्रमण होणार नाही.
डोंगरगांव रोड, महात्मा फुले चौकदेखील मोकळा झाल्याने तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बसस्थानकाचे दोन्ही प्रवेशद्वार व परिसर नेहमी अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक असताना याच परिसरात जास्त अतिक्रमण होत असल्याने या परिसरातील छोट्या व्यवसायिकांसाठी पालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भाजी मंडई व मंडईकडे जाणाºया रस्त्यावरदेखील पुन्हा अतिक्रमणाची लागण लागू नये यासाठीदेखील कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे.