मेहनतीच्या जोरावर अभयची राष्ट्रीय स्तरावर ‘उंचउडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:52 AM2020-01-12T11:52:38+5:302020-01-12T11:52:44+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत ...

Abhay's national level 'high-rise' on the basis of hard work | मेहनतीच्या जोरावर अभयची राष्ट्रीय स्तरावर ‘उंचउडी’

मेहनतीच्या जोरावर अभयची राष्ट्रीय स्तरावर ‘उंचउडी’

googlenewsNext

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत यशाला गवसणी घालणारा नंदुरबारातील उंचउडीपटू अभय गुरव याची संघर्षाची गाथा काही औरच आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो गुवाहटी येथे राज्याचे प्रतिनिधीत्व करीत असून खेळाच्या माध्यमातूनच त्याची आर्मी पोस्टमध्ये निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड होणारा तो जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.
एखादे ध्येय प्राप्त करावयाचे असल्यास त्यात तण-मनाने मेहनत घेतली पाहिजे. परिस्थितीचा बाऊ न करता ध्येय शिखर गाठले पाहिजे. त्यातून जे यश मिळते त्याचा आनंद काही औरच असतो. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील मुळचा अभय गुरव या उंचउडी पटूने हे सिद्ध करून दाखविले आहे.
घरची परिस्थिती जेमतेम, वडिल दुसऱ्या शेतात सालदरकी करणारे. अभयच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही म्हणून त्याला शिरपूरच्या एका होस्टेलमध्ये ठेवले. तेथून शिक्षण घेवून आल्यावर नंदुरबारात शिकण्यासाठी येवू लागला. घर चालविण्यासाठी स्वत: शेतात कामाला जावू लागला. खोंडामळी ते नंदुरबार ये-जा करण्यासाठी एस.टी.पासचा खर्च परवडत नसल्याने एकवेळ त्याने शाळाच सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे त्याला प्रा.डॉ.मयूर ठाकरे यांच्या माध्यमातून मार्ग सापडला आणि त्याने आपले पुढचे ध्येय साध्य केले.
मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ध्येय गाठणे सहज शक्य असते. त्यासाठी मात्र मनाची तयारी असावी. अभय हे त्याचेच एक उदाहरण असून तरुण खेळांडूपुढे तो एक चांगला आयडॉल ठरू शकणार आहे.

४अभय गुरव यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे शिक्षण घेत असतांना खोंडामळी गावातून नंदुरबार शहरात दररोज ये जा करूय होता. त्याला आर्थिक खर्च परवडत नसल्याने त्याने आता शिक्षणच बंद करावे असा निर्णय घेतला. परंतु शालेय मैदानी स्पर्धांच्या वेळी क्रिडा शिक्षक डॉॅ. मयूर ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याच्यातील तळमळ, काही करून दाखविण्याची जिद्द पाहून डॉ.ठाकरे यांनी त्याला दर महिन्याला एस.टी.बस पास काढून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे गावाहून नंदुरबारात येणे-जाणे सुकर झाले. शिवाय नंदुरबारात एका दुकानावर कामालाही तो लागला. हे सर्व करीत असतांना जिल्हा क्रिडा संकुलात त्याने डॉ.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उंच उडीच्या सरावाला सुरुवात केली. खेळातील बारकावे त्याला मिळाले. त्यातून तो बरेच काही शिकला. आपण काहीतरी करून दाखवू शकतो हे त्याला कळून चुकले आणि कठोर मेहनतीला सुरुवात केली. शालेय स्पर्धांमध्ये तो चमकू लागला. राज्यस्तरावर त्याची निवड झाली.

उंच उडी खेळासाठी पायात बुट नव्हते. शिवाय यासाठी कोणत्या प्रकारचे बूट लागतात हे देखील माहिती नव्हते. स्वत: कमवून त्याने बूट घेतले. इतर साहित्य मिळविले. शालेय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत उंच उडी क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले या कामगिरीच्या जोरावर अभयची आर्मी पोस्टमध्ये निवड झाली. जिल्ह्यातून तो एकमेव खेळाडू ठरला आहे. आता सुरू असलेल्या गोहाटी येथील खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

 

Web Title: Abhay's national level 'high-rise' on the basis of hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.