...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:10 AM2019-11-11T11:10:42+5:302019-11-11T11:11:03+5:30

आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत.

... Thats why the questions arises on Rama | ...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

...म्हणून रामावर उपस्थित होतात प्रश्न

Next
ठळक मुद्देदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठ हजार वर्ष उलटून गेल्यानंतरदेखील भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर लोक प्रश्न उपस्थित करतात. याचे कारण म्हणजे समाजात आता रामासारखे लोक दिसून येत नाहीत. त्यामुळेच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते रविवारी बोलत होते.
रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्षा व दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सचिव वीरजेश उपाध्याय, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे प्रामुख्याने उपस्थित होते. दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसतेचे स्वप्न दिले. त्यांनी दिलेले विचार आजदेखील तितकेच शाश्वत आहेत. बदलत्या काळात मूल्यांना कायम ठेवून विचारांची गती वाढविण्याची गरज आहे. दत्तोपंत ठेंगडी हे महान विचारक होते, परंतु विचारांच्या चौकटीत बंद नव्हते. त्यांच्यासारख्या महापुरुषांचे वचन व कर्म जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांचे व्यक्तित्व, कृतित्व व नेतृत्व समाजात प्रबोधित केले पाहिजे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले. वीरजेश उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर अजय पत्की यांनी आभार मानले.

अयोध्या प्रकरणात चांगला निर्णय : जोशी
अयोध्या प्रकरणात चांगला निर्णय झाला आहे. याचा लाभ सर्व देशाला मिळायला हवा. त्या आधारावर आता पुढे जायला हवे. मंदिर बांधण्यासंदर्भात ट्रस्ट पुढील प्रक्रिया ठरवेल असे डॉ.मुरली मनोहर जोशी म्हणाले. मथुरा आणि काशीसंदर्भात त्यांना विचारले असता तो मुद्दा आता कुणी उचलला आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ज्योती कलश यात्रेचे स्वागत
दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी ज्योती कलश यात्रा रविवारी नागपुरात पोहोचली. आर्वीहून ही यात्रा निघाली होती. शिवाय ठेंगडी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनीचेदेखील उद्घाटन झाले. संस्कार भारतीतर्फे हे प्रदर्शन साकारण्यात आले.

नेतृत्व करणाऱ्यांनी उपदेश कृतीत आणावा
‘टीमवर्क’ करत असताना नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांसोबत एकत्रितपणे राहून काम केले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ते स्वत: इतरांना देत असलेला उपदेश अगोदर कृतीत आणण्याची आवश्यकता असते. जसे बोलले तसेच वागले पाहिजे. शिवाय कर्तृत्ववान व्यक्ती जोडण्याकडे कल असला पाहिजे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

मातृशक्तीशिवाय कुठलीही संघटना अपूर्ण : सुमित्रा महाजन
सुमित्रा महाजन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. अखेर ‘रामलल्ला’ला स्वत:ची जागा मिळाली. याचे निश्चितच समाधान आहे. रामजन्मभूमीच्या एकूण लढ्यात महिलांचा मौलिक सहभाग होता. सामाजिक समरसतेशिवाय काहीच होऊ शकत नाही असे दत्तोपंत ठेंगडी मानायचे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणेच त्यांना आदरांजली ठरेल.
 

Web Title: ... Thats why the questions arises on Rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.