राऊतांची मुत्सद्देगिरी तर ठाकरेंच्या संघर्षाचा विजय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:39 PM2019-10-25T22:39:37+5:302019-10-25T22:43:31+5:30

उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली.

Rauta's diplomacy, Thakre's struggle victory | राऊतांची मुत्सद्देगिरी तर ठाकरेंच्या संघर्षाचा विजय 

राऊतांची मुत्सद्देगिरी तर ठाकरेंच्या संघर्षाचा विजय 

Next
ठळक मुद्देदमदार एन्ट्रीने राखली काँग्रेसची शान : कार्यकर्त्यांना मिळाली ताकद

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात गेल्या दशकापासून भाजपचा बोलबाला आहे. भाजपच्या हेवीवेट नेत्यांचे वास्तव्य व इलेक्शन मॅनेजमेंटमुळे काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र होते. मात्र, अशाही परिस्थितीत काँग्रेस नेते न खचता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवापासून नितीन राऊतविकास ठाकरे यांनी धडा घेतला. काहीही झाले तरी सर्वांना सोबत घ्यायचे व एकमेकांच्या विरोधात षड्यंत्र रचायचे नाही, अशी भूमिका घेतली. उत्तर नागपुरात नितीन राऊत रणनीती आखून लढले. राऊत यांचे तिकीट कापण्यासाठी दिल्लीवारी करणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सर्वप्रथम सोबत घेतले. ही लढाई सत्तेची नाही तर विचारांची आहे, हे पटवून दिले. आंबेडकरवादी विचारवंत, साहित्यिक व धर्मगुरुंच्या भेटी घेत त्यांची अप्रत्यक्षपणे मदत मिळविली. डॉ. माने यांच्यासाठी भाजपचे पक्ष संघटन पूर्णपणे कामाला लागले होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा महोत्सवात डॉ. माने हे संघ प्रणाम करतानाचा फोटो व्हायरल झाला. हे चित्र आंबेडकरी मतदारांनी चांगलेच मनावर घेतले. उत्तरमध्ये ज्या दिवशी बसपाने प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना नागपुरातून उमेदवारी दिली, यामागे राजकीय कट असल्याचे आंबेडकरवादी मतदारांना पटवून देण्यात राऊत यशस्वी झाले. तेथूनच राऊत यांना उघड पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येथे बसपाला पूर्वीपेक्षा कमी पाठबळ मिळाले. वंचित बहुजन आघाडी देखील निष्प्रभ ठरली.
विकास ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षात आपली इमेज सुधारण्यावर भर दिला. जनसंपर्क वाढविला. जीव ओवाळणाºया कार्यकर्त्यांची फळी तयार केली. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे भाजपमध्ये जाणार, त्यांचे भाजपशी सेटिंग झाले आहे, अशा चर्चा पिकल्या. त्यांच्या अवतीभवती असणारी मंडळीही यासाठी आग्रही होती. मात्र, ठाकरे हे सत्तेसोबत वाहून गेले नाही. आमदार नाही झालो तरी चालेल पण एवढी वर्षे सर्वकाही देणाºया काँग्रेस पक्षाशी बेईमान व्हायचे नाही, अशी भूमिका घेतली. हीच भूमिका काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भावली व तोच कार्यकर्ता ठाकरेंच्या विजयाची शपथ घेऊन घराबाहेर पडला. ‘भाऊ’ला आमदार करायचेच, असा निश्चय केला व पूर्णत्वासही नेला. महापालिकेच्या निवडणुकीत जिंकलेले, हरलेले, तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले, पक्ष संघटनेत काम करणारे सारेच एकत्र आण्यात ठाकरे यशस्वी झाले.
२०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे संपले, अशा वावड्या हेतूपूरस्सर उठविण्यात आल्या. दोनदा विधानसभेची निवडणूक हरणारा व नगरसेवकही बनू न शकणारा आता काय आमदार बननार, असा मुद्दा समोर करीत विरोधकांनीही प्रचारात ठाकरे यांना लक्ष्य केले. पण ठाकरे हे चार वेळा वेगवेगळ्या प्रभागातून विजयी झाले आहेत, याचा विसर टीकाकारांना पडला होता. ठाकरेंनी अखेरपर्यंत संयम सोडला नाही. उलट समर्थक, कार्यकर्त्यांना धीर दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल अशा मोठमोठ्या नेत्यांच्या नागपुरात प्रचारसभा झाल्या. मात्र, ठाकरे यांच्या मतदारसंघात एकही मोठी सभा झाली नाही. सभेत जाणारा वेळ गल्लीबोळात राहणाऱ्या मतदारांपर्यत पोहचण्यासाठी वापरण्याची रणनीती त्यांनी आखली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पडद्यामागे गाठून शांत करण्याची रणनीती भाजप आखत होती. यावेळी ठाकरे यांनी तीच रणनीती वापरली. भाजपमध्ये जाणार म्हणून जे भाजप कार्यकर्ते एकदा संपर्कात आले, त्यांना पुढे दूर जाऊ दिले नाही. त्यांच्या माध्यमातून भाजपची मते पोखरण्यात ठाकरे यशस्वी झाले.
गेली अनेक वर्ष ठाकरे यांनी काँग्रेससाठी संघर्ष केला. धरणे, आंदोलने, मोर्चे काढण्यासह नेत्यांच्या सभांसाठी गर्दी जमविण्याचे काम केले. राजकीय आमिषाला अन् दबावाला बळी पडले नाही. काँग्रेसचा ‘हात’ सोडला नाही. शेवटी त्यांच्या संघर्षाला यश मिळाले.

Web Title: Rauta's diplomacy, Thakre's struggle victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.