कब्रीतला समाधिस्थ : गायधनींची प्रज्ञापकड मजबूत असल्याने कविता सर्वकालीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 09:03 PM2019-08-12T21:03:26+5:302019-08-12T21:04:57+5:30

सुधाकर गायधनी हे विदर्भाच्या मातीतील कवी आहेत. सामाजिक जाणिवा आणि वेदना अनुभवलेल्या या कवीची प्रज्ञापकडही तेवढीच मजबूत आहे. म्हणूनच त्यांच्या कविता सर्वकालीन ठरतात, अशा भावना ‘कब्रीतला समाधिस्थ’या काव्यप्रकाशन सोहळ्याप्रसंगी पाहुण्यांंनी व्यक्त केल्या.

Kabritla Samadhist : Poetry of the Ghaidhanis is strong, poetry forever | कब्रीतला समाधिस्थ : गायधनींची प्रज्ञापकड मजबूत असल्याने कविता सर्वकालीन

कब्रीतला समाधिस्थ : गायधनींची प्रज्ञापकड मजबूत असल्याने कविता सर्वकालीन

Next
ठळक मुद्देपुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त झाल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुधाकर गायधनी हे विदर्भाच्या मातीतील कवी आहेत. सामाजिक जाणिवा आणि वेदना अनुभवलेल्या या कवीची प्रज्ञापकडही तेवढीच मजबूत आहे. म्हणूनच त्यांच्या कविता सर्वकालीन ठरतात, अशा भावना ‘कब्रीतला समाधिस्थ’या काव्यप्रकाशन सोहळ्याप्रसंगी पाहुण्यांंनी व्यक्त केल्या. विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या अर्पण सभागृहात ४६ वर्षांनंतर त्यांच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथे प्रकाशनचे प्रा. संजय नाथे होते. रेड स्वस्तिक संस्था मुंबईचे मुख्य प्रवर्तक टी. एस. भाल यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ज्येष्ठ कवियत्री आशा पांडे, प्रा. डॉ. कोमल ठाकरे प्रमुख पाहुणे होते.
यावेळी बोलताना टी. एस. भाल म्हणाले, सुधाकर गायधनी यांच्या आयुष्याचा आलेख खडतर आहे. आपली जुनी ओळख कुठेही न लपविता आणि आपल्या वाट्याला आलेल्या वेदना स्पष्टपणे मांडून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे. आपण आधीपासूनच त्यांचे वाचक आहोत. वाचकांचा एक प्रतिनिधी म्हणून प्रकाशनाची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
डॉ. कोमल ठाकरे म्हणाले, प्रज्ञापकड मजबूत असणारा कवीच वाचकाला जाणिवेतून नेणिवेकडे नेऊ शकतो. ही किमया साधण्याचे सामर्थ्य गायधनींच्या कवितेमध्ये आहे, म्हणूनच ४६ वर्षांनंतरही त्यांच्या कविता ताज्या वाटतात. आयुष्याच्या २४ व्या वर्षी लिहिलेले हे काव्य त्यांच्या काव्यप्रतिभेचा आरंभ होता. आपल्या काव्यातून सामाजिक जाणिवा मांडणारे ते प्रातिनिधिक कवी ठरतात. त्यांच्या सशक्त काव्यप्रतिभेमुळे मराठी साहित्याचे दालन समृद्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आशा पांडे म्हणाल्या, त्यांच्या कविता अस्वस्थतेच्या  निदर्शक आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी गायधनी यांनी उत्कटावस्थेतून लिहिलेल्या काव्याने नवा विचार दिला.
सुधाकर गायधनी यांनी १९७३ मध्ये या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाची आठवण करून दिली. ते म्हणाले, कवीचा आत्मसन्मान मोठा असतो. तो आपण सदैव जोपासला. कवीला इगो असावाच, मात्र तो सुंदर असावा, तोच कवीला प्रेरित करीत असतो. नवकवितेचा काळ आला तेव्हा अनेकांनी नाक मुरडले. मात्र त्यातूनच आठ खंडाचे आणि २६० पृष्ठांचे ‘योगिनींच्या स्वप्नसावल्या’ महाकाव्य जन्मास आले. आपल्या आयुष्यातील पडत्या काळात लोकमतच्या ‘नेमबाजी’ आणि ‘हाय राणी’ सदराने तारले, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
नाथे प्रकाशनचे प्रा. संजय नाथे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. गायधनी यांनी भविष्यात वीररसपूर्ण काव्यनिर्मिती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी सुधाकर कऱ्हाळे यांनी प्रस्तावनेवर आणि गायधनी यांच्या साहित्यकार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रेमा लेकुरवाळे यांनी तर आभार उद्धव साबळे यांनी मानले. यवतमाळचे सुनील भेले यांनी पोस्टर पोएट्रीने सभागृहाचे दालन सजविले होते. यावेळी अनेकांनी गायधनी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kabritla Samadhist : Poetry of the Ghaidhanis is strong, poetry forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.