करार न करताच कचरा उचलण्याचे कंत्राट : मनपा विशेष सभेत विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 11:46 PM2019-12-07T23:46:25+5:302019-12-07T23:47:59+5:30

महापालिकेने ११ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील कचरा संकलनाचे कार्यादेश एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया या कंपन्यांना दिले. परंतु ७ डिसेंबरपर्यंत महापालिका व कंपन्यात कोणत्याही प्रकारचा करारनामा झाला नसल्याची बाब महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी निदर्शनास आली.

Garbage disposal without contract: Opposition raises questions at Municipal Special Meeting | करार न करताच कचरा उचलण्याचे कंत्राट : मनपा विशेष सभेत विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

करार न करताच कचरा उचलण्याचे कंत्राट : मनपा विशेष सभेत विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

Next
ठळक मुद्देआयुक्तांना महापौरांचे २० पर्यंत करार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने ११ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील कचरा संकलनाचे कार्यादेश एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया या कंपन्यांना दिले. या दोन्ही कंपन्यांनी १६ नोव्हेंबरपासून शहरातील कचरा संकलनाला सुरुवात केली. परंतु ७ डिसेंबरपर्यंत महापालिका व कंपन्यात कोणत्याही प्रकारचा करारनामा झाला नसल्याची बाब महापालिकेच्या विशेष सभेत शनिवारी निदर्शनास आली.
महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित विशेष सभेत शहरातील कचरा संकलनासंदर्भात करण्यात आलेल्या कराराची माहिती सदस्यांनी विचारली असता आयुक्त अभिजित बांगर यांनी अद्याप करार झालेला नाही. यावर महापौर संदीप जोशी यांनी २० डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत करार करण्याचे निर्देश दिले. तसेच सभागृहात चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा यात समावेश करण्यात यावा. सर्वसमावेशक असा करारनामा करावा, यामुळे भविष्यात कंपन्यांना मनमानी करता येणार नाही, अशी भूमिका मांडली.
सभागृहात कचरा संकलनावरील चर्चेत ३५ सदस्यांनी सहभाग घेतला. ३० डिसेंबरपर्यंत शहरातील १०० टक्के कचरा उचलला जावा, असे निर्देश जोशी यांनी दिले. त्यानंतर कचऱ्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार यायला नको, प्रशासन व सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागपूर शहराला स्वच्छ बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढील १५ दिवसात शहरातील बाजारातील भाजी, फळ विक्रेते व अन्य विक्रे त्यांना डस्टबिनमध्येच कचरा टाकण्याची सक्ती करावी. सायंकाळी ६ पर्यंत कचरा उचलला जावा, मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी मनपाच्या नावाचा फलक लावण्यात यावा, भूखंडधारक पुढे येत नसेल तर अशा भूखंडाचा लिलाव क रण्यात यावा. नवीन कंपनीतर्फे यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु शहरातील काही भागात कचरा संकलनासाठी मोठी वाहने जाणे शक्य नाही. अशा भागात लहान वाहने अथवा रिक्षाची व्यवस्था करावी. यामुळे नागरिक रस्त्यांवर कचरा टाकणार नाही. १० डिसेंबरपर्यंत झोनस्तरावर नियुक्त कर्मचाऱ्यांची यादी नगरसेवकांना उपलब्ध करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जोशी यांनी दिला.
कचरा संकलनाबाबतचा प्रश्न काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला. भाजपचे सतीश होले यांनी दोन्ही कंपन्यांच्या दरात तफावत कशी असा प्रश्न केला. एका कंपनीला प्रति टन १९५० तर दुसऱ्या कंपनीला प्रति टन १८०० रुपये दर देण्यात आला. अशी तफावत का, असा सवाल त्यांनी केला.
भाजपाचे धरमपाल मेश्राम म्हणाले कनकच्या वाहनाची क्षमता १.५ मे.टन होती. नवीन कंपन्यांच्या वाहनांची क्षमता ०.८ मेट्रिक टन आहे. भाजपचे नगरसेवक प्रकाश भोयर यांनी मिनी टिप्परचा प्रश्न उपस्थित केला.
मनोज सांगोळे यांनी कचरा संकलनात सुधारणा झाल्याचे सांगितले. हरीश ग्वालबंशी यांनी कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा मुद्दा उपस्थित केला. लक्ष्मी यादव यांनी त्यांच्या प्रभागात कचरा संकलनाचे एकच वाहन असल्याचे सांगितले. पुरु पोत्तम हजारे यांनी पारडी प्रभागात ७० टक्के भागात वाहने पोहचत नसल्याचे निदर्शनास आणले. काँग्रेसचे संदीप सहारे यांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी नियुक्त सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कंपनीच्या नियुक्तवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर लाखो रुपये खर्च होत असूनही महापालिकेला उपयोग नसल्याचे निदर्शनास आणले.
संजय महाकाळकर यांनी ताजबाग भागातील कचरा संकलनाची समस्या कायम असल्याचे सांगितले. यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली. नितीन साठवणे, वंदना भगत, मोहम्मद जमाल, किशोर जिचकार आदींन चर्चेत सहभाग घेतला. माजी महापौर प्रवीण दटके यांनी कचरा संकलनाचा करार सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मागणी केली. यात सर्व नगरसेवकांच्या सूचनांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना केली.
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी माती मिश्रित कचरा व बांधकाम साहित्य उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची सूचना केली. कचरा संकलनासाठी महापालिका कनकच्या तुलनेत नवीन कंपन्यांना दररोज पाच लाख अधिक देत असल्याचे अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी निदर्शनास आणले. सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी नगरसेवकांच्या प्रस्तावांचा समावेश करावा, लहान वाहनांची संख्या वाढविण्याची सूचना केली.

बाजारात रात्रीला कचरा सफाई: आयुक्त
शहराती कचरा संकलनाचे १०० टक्के उद्दिष्ट आहे. ते लवकर प्राप्त करण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. व्यावसायिक प्रतिष्ठान,रेस्टारंट, हॉटेल आदी ठिकाणचा कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जात नाही. बाजारात रात्री १२ ते ३ पर्यत स्वच्छता करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. कंपन्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी कर्मचारी व अधिकारी तसेच नगरसेवकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकत्र साठविला जात आहे कचरा-वनवे
शहरातील कचरा संकलनात सुधारणा झालेली आहे. यात आयुक्तांची भूमिका प्रशंसनीय आहे. परंतु ओला व सुका कचरा संकलित केल्यानंतर तो एकाच गाडीतून नेला जातो. भांडेवाडी येथे वेगळा साठविला जात नाही. कचरा संकलन झोन स्तरावर व्हावे, बाजार भागात रात्रीला कचरा उचलला जावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

महापौरांचे दिशानिर्देश

  • जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र गोळा करणे, अवैध मटन विक्रेत्यांवर अंकुश लावणे, सफाई कर्मचारी ते सहायक आयुक्त यांची स्वच्छतेबाबत धोरण निश्चित करावे. यासाठी आरोग्य समितीकडे प्रस्ताव पाठवावा.
  • संबंधित प्रकरणात आरोग्य समितीने आपला अहवाल ३० डिसेंबरपूर्वी द्यावा.
  •  रात्रपाळीत एनडीएसच्या ५० जवानांची बाजार भागात नियुक्ती करावी. त्यांनी घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच या पथकाला पोलिसांच्या धर्तीवर अधिकार प्राप्त करण्यासाठी विधी समितीने प्रस्ताव सादर करावा.
  •  आरोग्य विभागाचे विभाजन करुन चोकेज दुरुस्त करणाऱ्या पथकाचा स्वतंत्र विभाग गठित करावा.

 

 

Web Title: Garbage disposal without contract: Opposition raises questions at Municipal Special Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.