coronavirus; अन् इराणमधून मुस्लिम यात्रेकरू झाले ‘एअरलिफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:52 AM2020-03-18T10:52:11+5:302020-03-18T10:54:07+5:30

चित्रपटाची कथा शोभावी असे घटनाचक्र इराणमध्ये अडकलेल्या ४४ मुस्लिम बांधवांनी अनुभवले. अंधकारमय स्थितीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले.

airlift from Iran to 'India' | coronavirus; अन् इराणमधून मुस्लिम यात्रेकरू झाले ‘एअरलिफ्ट’

coronavirus; अन् इराणमधून मुस्लिम यात्रेकरू झाले ‘एअरलिफ्ट’

Next
ठळक मुद्दे नितीन गडकरींनी मध्यरात्री हलविली प्रशासकीय यंत्रणा ‘कोरोना’च्या सावटात अडकले होते ४४ भाविक

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ‘ते’ ४४ जण मोठ्या उत्साहाने इराणमध्ये पोहोचले. परंतु अचानक ‘कोरोना’चा प्रकोप वाढला अन् सर्वांच्या पायाखालील जमीनच सरकली. दिवसभर हॉटेलमध्ये मुक्काम, ना कुणाची मदत ना वैद्यकीय तपासणी. मायदेशी परतण्यासाठी काय करावे याची दिशाच मिळत नव्हती. अशा स्थितीत एका केंद्रीय मंत्र्याला त्यांची स्थिती कळते काय, मध्यरात्री प्रशासकीय यंत्रणा हलते काय अन् काही दिवसांत सर्व अडचणींच्या चक्रव्यूहाला भेदत सर्व भाविक सुखरूपपणे ‘एअरलिफ्ट’ होऊन भारतभूमीवर परततात काय! अक्षरश: चित्रपटाची कथा शोभावी असे घटनाचक्र इराणमध्ये अडकलेल्या ४४ मुस्लिम बांधवांनी अनुभवले. अंधकारमय स्थितीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले.
२२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील ४४ मुस्लिम यात्रेकरूंचा जत्था इराणकडे निघाला. त्यांनी तेहरान तसेच क्वोम इत्यादी शहरांत जाऊन प्रार्थनास्थळांचे दर्शन घेतले. या कालावधीत इराणमध्ये ‘कोरोना’ची लागण व्हायला सुुरुवात झाली व काही दिवसांतच प्रकोप जास्त प्रमाणात वाढला. सर्व यात्रेकरू चिंतित झाले होते व हॉटेल्समध्ये राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. २७ फेब्रुवारीपासून सर्व लोक तेहरानपासून ६० किलोमीटर अंतरावरील एका हॉटेलमध्येच थांबले होते. ते वैद्यकीय तपासणी तसेच भारतात परतण्यासाठी विमानाचीच प्रतीक्षा करत होते. मात्र त्यांना स्थानिक प्रशासनाकडून काहीच मदत मिळाली नाही. यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव शरफुद्दीन मोमीन हेदेखील होते. त्यांनी या स्थितीत राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव आर.एच.तडवी यांच्याशी ८ मार्च रोजी संपर्क साधला. तडवी यांनी तातडीने नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला ही बाब कळविली. गडकरी यांना ही स्थिती कळताच ८ तारखेलाच मध्यरात्री ९प्रशासकीय यंत्रणेला त्यांनी कामाला लावले. गडकरी यांच्या कार्यालयातून परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना सर्व यात्रेकरूंशी तत्काळ संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासंदर्भात तातडीने विनंती करण्यात आली.
खुद्द गडकरी यांनीदेखील वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला. त्यानंतर इराणमधील भारतीय दूतावासाने यात्रेकरूंशी संपर्क साधला व भारतीय चमूने त्यांची तपासणी केली. चाचण्यांचे भारतातून अहवाल येण्यास ३ ते ४ दिवसांचा अवधी लागला व सर्व जण ‘निगेटिव्ह’ आले. त्यानंतर १५ मार्च रोजी अखेर सर्व यात्रेकरु सुखरूपपणे मायदेशी परतले. हे यात्रेकरू भारतात सुरक्षित येईपर्यंत गडकरी सातत्याने पाठपुरावा करत होते.

सर्व प्रवासी सुखरूप
यात्रेकरूंनी संपर्क केल्यावर सुरुवातीला मलादेखील काहीच कळले नाही. अशा स्थितीत नितीन गडकरीच मदत करू शकतात असा विश्वास असल्याने त्यांच्या कानावरच ही गोष्ट टाकली. त्यांच्या पुढाकारामुळेच सर्व यात्रेकरू सुखरूप पोहोचू शकले. सर्व प्रवाशांना जैसलमेर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले असून ते सुखरूप आहेत, असे आर. एच. तडवी यांनी स्पष्ट केले.

Web Title: airlift from Iran to 'India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.