Join us  

इमारतीवरून उडी घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 2:17 AM

ठाणे पोलिसांनी वाचवले दुसऱ्यांदा प्राण : उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात केले दाखल

ठाणे : वेगवेगळ्या कारणांमुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोरच यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाºया प्रीती त्रिदेव केणे (२४, रा. आंंबिवली, ठाणे) हिने मंगळवारी पुन्हा याच कार्यालयासमोरील पोलीस वसाहतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या इमारतीमधील रहिवासी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी आपला जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविले. तिला सुरुवातीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रीतीने १७ जुलै रोजी सकाळी ७च्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काचेच्या तुकड्याने स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही तिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी तिच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.

रिक्षाचालक त्रिदेव केणे (३०, रा. खडवली) याच्याबरोबर तिचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले. या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. कौटुंबिक वादातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरूहोता. यातूनच तिने पती आणि सासू, सासºयांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये पतीचे नाव वगळावे, केवळ सासूसासºयांचे नाव ठेवावे, अशी तिची मागणी आहे. तिचा पहिला कायदेशीर घटस्फोट झाला आहे की नाही, याबाबत साशंकता असून, दुसºया विवाहाचीही तिच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. पतीने मात्र ती आपली पत्नी नसल्याचा दावा केल्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. माझे सासू, सासरे हे पती त्रिदेव याला घेऊन गेले आहेत. त्याला भेटू देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणून तिने १७ जुलै आणि त्यापाठोपाठ २३ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील भास्कर या पोलीस अधिकारी वसाहतीमधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. जिन्याच्या खिडकीतून ती पाचव्या मजल्यावरील सज्जाच्या भागात पोहचली. तिथे पाय खाली सोडून बसल्यामुळे तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी त्या भागात उतरुन तिचा जीव वाचविला. त्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

प्रीतीच्या तक्रारीनुसार पती, सासू आणि सासºयांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तिने आधी त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर तिने पतीला सोडण्याची आणि जामिनाची मागणी केली. न्यायालयातून पतीला जामिनही मिळाला. पण तिच्या विचित्र वर्तणुकीमुळे पती आणि सासरचे तिला नांदवायला तयार नाहीत. पतीने लग्न झालेले नसल्याचा दावा केला आहे. शिवाय, तिची दरवेळी वेगवेगळी मागणी असल्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. तिच्यावर मानसिक उपचाराचीही गरज आहे.- संजय पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

टॅग्स :आत्महत्या