Join us  

क्लस्टर योजना केव्हा होणार सुरु, ठाण्यात ४४ अतिधोकादायक इमारतींमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव शहरात ४ हजार ५१७ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:10 PM

भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर ठाण्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीत राहणाºया हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरात आजच्या घडीला ४ हजार ५१७ इमारती असून त्यात ७९ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक मधील ४४ इमारतीमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव्य आहे.

ठाणे : भिवंडीत दोन दिवसापूर्वी झालेल्या इमारत दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे धोकादायक किंवा जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाण्यात आजच्या घडीला ४ हजार ५१७ इमारती धोकादायक असून ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी ४४ इमारतींमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव्य आहे. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना ठाणेमहाापलिकेने क्लस्टर योजना पुढे आणली होती. त्यानुसार पहिल्या टप्यात सहा ठिकाणी याची कामे सुरु होणार होती. परंतु कोरोनामुळे क्लस्टरचे कामही रखडले आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतीत राहणाºया रहिवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.                भिवंडीत इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. शहरातील ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी पालिका प्रशासनाने केवळ ३५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून उर्वरीत ४४ इमारतींमध्ये अजूनही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यात सर्वाधिक धोका हा नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात असलेल्या इमारतींना असून ३८ पैकी केवळ १३ इमारतीच रिकाम्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.शहरात पावसाचा जोर कायम असून शहरात पडझडीच्या घटना देखील सुरु झाल्या आहेत. आता ठाण्यात देखील अजूनही ४४ अतिधोकादायक इमारतींमध्ये रिहवाशांचे वास्तव्य असून या इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न या भिवंडीच्या घटनेनंतर उपस्थित करण्यात येत आहे. यंदा केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ठाणे पालिका क्षेत्रातील नऊ प्रभग समिती मधील सुमारे ४ हजार ५१७ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७९ इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी ३५ इमारती रिक्त करण्यात आल्या असून आता केवळ ४४ इमारती या प्रकारांमध्ये शिल्लक आहेत. त्याही रिक्त करण्याची प्रक्र ीया सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्याचबरोबर सी- २ ए मध्ये १२३ इमारतींचा समावेश आहे. सी -२ बी मध्ये २३२६ आणि सी -३ मध्ये १९८९ इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक शिल्लक इमारतींमध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक कुटूंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारीची उपाययोजना म्हणून घरे रिकामी करण्याच्या नोटीसा आधीच पालिकेने बजावलेल्या आहेत. मात्र, कोरोना आणि पावसाळयाच्या दुहेरी संकटामुळे अनेक इमारतींमधील रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजा वाजा करुन ठाण्यातील क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाल्याचे सांगून ४४ युआरपी पैकी सहा युआरपीचे काम सुरु करण्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये किसननगर, हाजुरी, कोपरी, राबोडी, लोकमान्य नगर आणि राबोडी यांचा समावेश होता. त्यानुसार किसनगरच्या क्लस्टरचे भुमीपुजनही करण्यात आले होते. परंतु त्यानंतर आजही एक वीटही येथे लागलेली नाही. त्यात मार्च पासून आलेल्या कोरोनामुळे क्लस्टर योजनेचे कामही लांबणीवर पडल्याचे दिसून आले. आता सहा महिन्यानंतर या सहा युआरपीमध्ये सर्व्हेचे काम सुरु झाल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. आता सर्व्हे झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. याचाच अर्थ अद्यापही ही योजना मार्गी लागण्यास अवधी जाणार आहे. त्यामुळे ही योजना लवकरात लवकर मार्गी लागावी अशी आशा ठाणेकर नागरीक करीत आहेत. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाआयुक्त