मुंबई : मुंबईतील नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाने १३ वास्तूविशारदांची निवड केली आहे. वास्तूविशारदांनी आराखडा सादर केल्यानंतर यामधील एका आराखड्याची पुनर्विकासासाठी निवड करण्यात येणार असल्याचे, म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाने निविदा मागविल्या होत्या. या निविदांना २४ वास्तूविशारदांनी स्वारस्य दाखवले होते. छाननी प्रक्रियेनंतर २४ पैकी १३ वास्तूविशारदांची निवड म्हाडाने केली आहे. या वास्तूविशारदांना तिन्ही चाळींचा प्राथमिक आराखडा तयार करण्याची संधी देण्यात आली आहे. यामधून ३ उत्कृष्ट वास्तूविशारदांना सन्मानित करण्यात येणार असून त्यापैकी एका आराखड्याची निवड पुनर्विकासासाठी करण्यात येणार आहे.निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी म्हाडाने वास्तुविशारदांना काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये ५ हजार भाडेकरू किंवा झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासह अनेक अटींचा यामध्ये समावेश होता. वास्तूविशारदांनी पुनर्विकास आराखडा सादर केल्यानंतर यामधील एका कंपनीच्या आराखड्यानुसार बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार आहे. आराखडा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाल्याने बीडीडी चाळीचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
बीडीडी चाळींसाठी वास्तूविशारदांची निवड
By admin | Updated: August 31, 2015 03:09 IST