Join us  

मास्क वापरा, आता सोडतो;  पुन्हा सापडल्यास चौकीत नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 2:32 AM

पाेलिसांचा इशारा; काेरोनाला रोखण्यासाठी कठोर कारवाई तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना विषाणू समूळ नष्ट करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उल्लेखनीय पावले उचलली जात असली तरी बहुतांश नागरिक नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे. अशा नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी प्रशासन विविध उपाय करत असून, मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. ‘आता सोडतो आहे, पुन्हा सापडलात तर चौकीत नेणार,’ असा इशाराही पाेलिसांकडून देण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. परिणामी, विनाकारण होणारी गर्दी, सामाजिक अंतर न पाळणे, मास्क परिधान न करणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई महापालिका आणि पोलीस कारवाई करीत असून, जे नागरिक ऐकत नाहीत अशांना आता मुंबई पोलिसांकडून सज्जड दम दिला जात आहे.विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मास्क परिधान न करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. विनाकारण गर्दी करीत सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी मुंबई पोलीस नाक्यानाक्यांवर कारवाई करीत आहेत. कुर्ला येथील बैल बाजार परिसरात माेठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. ‘आता सोडतो मात्र पुन्हा सापडलात तर पोलीस चौकीत नेऊ, दोनशे रुपये वर आले आहेत का?’ असे विचारत  कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे, याची जाणीवही पाेलीस करून देत आहेत. मात्र, एवढी कारवाई करूनही मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा पोलिसांनी पाठ फिरवताच अनेकांकडून पुन्हा नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे.

मास्क वापरा, गर्दी टाळा; अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनnकोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकिरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.  nमास्क वापरा, गर्दी टाळा: अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.nसार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे.nजे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.  nकोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.nमास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये एवढ्या दंडाची आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्येदेखील धडक कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या